भाई गणपतराव देशमुखांच्या पुतळा अनावरणास देवेंद्र फडणवीस येणार
![](https://thinktanklive.in/wp-content/uploads/2023/07/Capture-2023-07-17-16.52.04-780x470.jpg)
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
भाई गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त सांगोला येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. विज्ञान महाविद्यालयाचे “भाई गणपतराव देशमुख महाविद्यालय” नामकरण आणि भाई गणपतराव देशमुख यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत. डॉ. बाबासाहेब देशमुख आणि डॉ. अनिकेत देशमुख यांनी आज मुंबईत त्यांची भेट घेऊन निमंत्रण दिले. ना. फडणवीस यांनी कार्यक्रमास येण्यास होकार दिल्याची माहिती डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिली.
१३ ऑगस्ट रोजी कार्यक्रम
येत्या १३ ऑगस्ट रोजी भाई गणपतराव देशमुख यांची जयंती आहे. त्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान महाविद्यालयाचे भाई गणपतराव देशमुख महाविद्यालय नामकरण करण्यात येणार आहे. या महाविद्यालयासमोरच भाई गणपतराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. हा आकर्षक पुतळा सांगोला येथे दाखल झाला आहे.
हे दोन्ही कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे निमंत्रण पत्र डॉ. बाबासाहेब देशमुख आणि डॉ. अनिकेत देशमुख यांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन दिले. सदरच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यास फडणवीस यांनी होकार कळवला आहे.
चारा छावण्याची बिले देण्याची मागणी
सांगोला तालुक्यातील गतवेळच्या चारा छावण्याची रखडलेली 21 कोटीहून अधिक रुपयाची देणीही तात्काळ द्यावीत, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. सध्या सांगोला तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात, असे निवेदन डॉ.बाबासाहेब आणि अनिकेत देशमुख यांनी आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दिले.
कार्यक्रम भव्य होणार
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील राजकारण तापू लागले आहेत. सर्व पक्षांच्या नेत्यांनी जनसंपर्क वाढविला आहे. आ. शहाजीबापू पाटील यांनी कार्यक्रमाचा सपाटा लावला आहे. अजित पवार यांच्या सरकारमधील सहभागानंतर त्यांनी आपली भूमिका मवाळ करत अजित पवार यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अनेक वर्षे सत्ताधारी राहिलेल्या शेकाप नेत्यांनीही आता या कार्यक्रमाच्या निमित्ताने वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.