थिंक टँक स्पेशलराजकारण
Trending

शेकापच्या घराणेशाहीला विरोध वाढला

आबा-बापू गटाकडून उघड भूमिका

Spread the love

“मागील पन्नास वर्षाच्या कार्यकाळात एक हाती सत्ता देऊन स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख यांनी जो निर्णय घेतला त्याला आजवर तालुक्याने सन्मान दिला. आता त्यांचे नातू निर्णय घ्यायला लागले ते तालुक्याने मान्य करायचे का? ही घराणेशाहीची परंपरा मोडून काढत बाजार समितीचा पारदर्शी कारभार करुन बळीराजाला न्याय मिळवून देणार आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे. आता जिंकण्याच्या इराद्याने कार्यकर्त्यांनी निवडणुकीत उतरावे. विजय निश्चित आपलाच असेल”, असा विश्वास आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला आहे.

थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
सांगोला तालुक्यावर तब्बल ५५ वर्षे लाल बावटा फडकवत ठेवलेल्या शेतकरी कामगार पक्षाला सर्वपक्षियांनी चांगलेच खिंडीत गाठले आहे. शेकापची घराणेशाही रोखण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील तसेच काँग्रेस, भाजप हे सर्वजण एकवटले आहेत.

सर्व पक्ष झाले सक्रिय
सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक जाहीर झाल्याने तालुक्यात पुन्हा एकदा शेकाप, शिवसेना, – राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेसचे कार्यकर्ते सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. बाजार समितीवर अनेक वर्षे एकहाती सत्ता अबाधित ठेवणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला यंदाच्या निवडणुकीत रोखण्यासाठी सर्व पक्षीय नेते एकत्र आले आहेत. या निवडणुकीबाबत स्वतंत्रपणे लढण्यासाठी तालुक्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित मोट बांधण्याचे निर्णय घेतला आहे.

या बैठकीस आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्यासह ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड, प्रा. पी. सी. झपके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, शिवसेनेचे नेते भाऊसाहेब रुपनर, माजी नगरसेवक शिवाजी बनकर, भाजपाचे नेते संभाजी आलदर उपस्थित होते. या विचार विनिमय बैठकीसाठी सांगोला तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन-संचालक, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेकापचे एकला चलो
सांगोला बाजार समितीची निवडणूक शेकाप स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केल्याने पुन्हा एकदा शेकाप विरुद्ध सर्वपक्षीय आघाडी अशी काट्याची टक्कर रंगणार आहे. दरम्यान, आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत आदी नेत्यांनी बाजार समितीची निवडणूक मोठ्या ताकदीने लढवणार असल्याचे स्पष्ट केल्याने बाजार समितीची निवडणूक अटीतटीची होणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विचार विनिमय करण्यासाठी सर्व प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीस मार्गदर्शन करताना आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Patil) यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्धार केला आहे.

आता नातूचे ऐकायचे का?
“मागील पन्नास वर्षाच्या कार्यकाळात एक हाती सत्ता देऊन स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख यांनी जो निर्णय घेतला त्याला आजवर तालुक्याने सन्मान दिला. आता त्यांचे नातू निर्णय घ्यायला लागले ते तालुक्याने मान्य करायचे का? ही घराणेशाहीची परंपरा मोडून काढत बाजार समितीचा पारदर्शी कारभार करुन बळीराजाला न्याय मिळवून देणार आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची आहे. आता जिंकण्याच्या इराद्याने कार्यकर्त्यांनी निवडणुकीत उतरावे. विजय निश्चित आपलाच असेल”, असा विश्वास आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला आहे.

आता मात्र भाई गणपतराव देशमुख यांच्या पश्चात “आम्ही नातूचे ऐकायचे का?” असा सवाल करत स्वतंत्रपणे आपले अस्तित्व दाखवण्याचा इरादा पक्का केला आहे. यातून आगामी विधानसभा निवडणुकीच्या लढतीची नांदी दिसून येत आहे.

दीपकआबाही निर्णायक भूमिकेत
बाजार समितीच्या निवडणुकी निमित्ताने माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील हेही वेगळ्या मनस्थितीत आहेत. त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यासोबत वेगळा निर्णय घेण्याचे निश्चित केले आहे.

विनंतीला मान दिला, परंतु अर्थ वेगळा काढला
माजी आमदार दीपक साळुंखे पाटील (Deepak Salunkhe Patil) या बैठकीत म्हणाले की, “स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर आम्हा सर्वांना सहानुभूती होती. त्यामुळे सूतगिरणी, सोसायटी, खरेदी-विक्री संघ या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केले. त्यांच्या विनंतीला मान दिला, परंतु याचा अर्थ त्यांनी वेगळा काढत गावगाड्यांच्या राजकारणात वेगळे वातावरण निर्माण केले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनिमित्त कार्यकर्त्यांकडून त्याचा उद्रेक पाहायला मिळत आहे. भावनांचा आदर करून कार्यकर्त्यांना जे पाहिजे तेच राजकारणात घडेल. राज्यात एक आदर्शवादी कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करू.”

सुरक्षित बाजार समितीचे स्वप्न साकार करू
“शेतकरी बांधवांच्या सुरक्षिततेसह त्यांना लागणाऱ्या सर्व सुखसोयी निर्माण करून देण्यात येतील. त्यासाठीच सुरक्षित बाजार समितीचे स्वप्न साकार करणे गरजेचे आहे, म्हणून ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी ही निवडणूक जिंकायची आहे. भविष्यात सांगोला (Sangola) कृषी उत्पन्न समिती ही एक आदर्शवत संस्था बनेल, यासाठी कायम पाठीशी असणार आहे.” असे मत आमदार शहाजीबापू पाटील यांनी मांडले आहे.

आगामी वाटचालीची नांदी
शेतकरी सहकारी सूत गिरणी आणि खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाने आपले वर्चस्व कायम राखले.bया निवडणुकीत आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी समन्वयाची भूमिका घेतल्याने दोन्ही संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. भाई गणपतराव देशमुख हे हयात असल्यापासून या सर्व निवडणुकांत आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी समन्वयाची भूमिका घेऊन त्यांना सहकार्य केले.

आता मात्र भाई गणपतराव देशमुख यांच्या पश्चात “आम्ही नातूचे ऐकायचे का?” असा सवाल करत स्वतंत्रपणे आपले अस्तित्व दाखवण्याचा इरादा पक्का केला आहे. यातून आगामी विधानसभा निवडणुकीच्या लढतीची नांदी दिसून येत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक स्वबळावर लढविणार असल्याचे या सर्व पक्षियानी जाहीर केल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत हे सर्व पक्ष शेकापला रोखण्यासाठी एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

शेकापचा कसोटीचा काळ
बाजार समितीवर सत्ता कायम राखण्यासाठी शेकापचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख यांना राजकीय ताकद पणाला लावावी लागणार आहे. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत शेकापला आपली पूर्ण ताकद सिद्ध करावी लागणार आहे.

त्यामुळे बाजार समितीवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी शेकापविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या ताकदीने सक्रीय झाल्याने बाजार समितीची निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये कोण बाजी मारणार हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका