मधुमेही रुग्णांनो, सकाळी नियमित करा ‘या’ गोष्टी

थिंक टँक स्पेशल
मधुमेह असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आपण या आजाराला बळी पडू नये यासाठी सध्या तरुण मंडळी तब्बेतीकडे विशेष लक्ष देत असल्याचे जाणवते. ज्यांना हा आजार झाला आहे ते अधिक फिट राहण्याच्या प्रयत्नात असतात. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. यासाठी व्यायाम, औषधोपचार असे पर्याय अवलंबले जातात.
सकाळी काही गोष्टी नियमित केल्याने मधुमेह असणाऱ्यांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होऊ शकते.
कोणत्या आहेत या सवयी जाणून घ्या
निरोगी राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला हायड्रेट राहण्याचा सल्ला दिला जातो. सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझम सुधारते आणि पचनक्रिया नीट होते. त्यामुळे मधुमेह रुग्णांनी सकाळी उठल्यावर किमान एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावावी.
मॉर्निंग वॉकमुळे शरीरातील इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी दररोज सकाळी चालायला जावे. तसेच चालल्यामुळे शरीराची हालचाल होते, ज्यामुळे वजन कमी होण्यासही मदत मिळु शकते.
मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज सकाळी उठल्यानंतर ब्लड शुगर म्हणजेच रक्तातील साखरेची पातळी तपासणे गरजेचे आहे. यामुळे जर रक्तातील साखरेची पातळी वाढली असेल किंवा कमी झाली असेल तर गंभीर समस्या उद्भवण्या आधी तुम्ही तज्ञांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेऊ शकाल. घरी रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी तुम्ही ग्लुकोमीटर (Glucometer) वापरू शकता.
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी सकाळचा नाश्ता कधीही टाळू नये, कारण नाश्ता केल्याने दिवसभरातील कामं करण्यासाठी शरीराला ऊर्जा मिळते. सकाळच्या वेळी तेलकट पदार्थ खाणे टाळा, यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
सकाळच्या नाश्त्यामध्ये बदामाचा समावेश करू शकता. बदामामध्ये प्रोटिन, अँटिऑक्सिडंट आणि हेल्दी फॅट्स भरपूर प्रमाणात आढळतात. रात्री काही बदाम भिजत ठेऊन ते सकाळी खाऊ शकता.
ग्रीन टी अँटिऑक्सिडंटचे उत्तम स्त्रोत मानले जाते. तसेच ‘ग्रीन टी’मध्ये असणारे पॉलिफेनोल्स आणि हायपोग्लायसेमिक इफेक्टमुळे नैसर्गिकरित्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्ती नाश्त्यामध्ये ‘ग्रीन टी’चा समावेश करू शकतात.
सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात बी, सी, इ आणि पोटॅशिअम आढळते. सफरचंद खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासोबतच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. त्यामुळे मधुमेह रुग्णांसाठी सफरचंदाचा नाश्त्यात समावेश करणे फायदेशीर ठरेल.
शेंगदाण्यांमध्ये अनसॅच्युलेटेड फॅट आणि अनेक पोषक तत्त्व असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. उकडलेली अंडी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्ती नाश्त्यामध्ये उकडलेल्या अंडयांचा समावेश करू शकतात.
दालचिनी मधुमेहावरील उत्तम घरगुती उपचार असल्याचे मानले जाते. सकाळी गरम पाण्यामधून दालचिनी घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्याबरोबर मेटाबॉलिझम सुधारण्यास आणि फॅट बर्न करण्यास मदत होते.
मधुमेह झालेल्यांना पायावर जखम होणे, त्वचेची साल निघणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळी नियमितपणे पाय तपासा, काही समस्या जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
पाहा खास व्हिडिओ