सांगोल्याच्या साहित्य संमेलनातही.. ‘काय झाडी, काय डोंगार’
सांगोला/नाना हालंगडे
राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन शनिवार (ता. 8) पासून सांगोल्यात सुरू झाले. पहिल्याच दिवशी उद्घाटन समारंभात राजकारण्यांसह कवी संमेलनातील कवींनाही ‘काय झाडी, काय डोंगर..’ या वाक्याची भुरळ पडलेली दिसून आली. साहित्य संमेलन सांगोल्यात असल्यामुळे सांगोल्याचे आमदारांच्या ‘काय झाडी, काय डोंगर’ पुन्हा चर्चेत आले आहे. (Shahaji Patil Sangola)
राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील आहेत. या साहित्य संमेलनामध्ये संमेलनाचे संमेलनाध्यक्ष इंद्रजीत भालेराव, उद्घाटक महसूल मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माड्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, स्वागताध्यक्ष सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, आमदार समाधान अवताडे,
माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार लक्ष्मण ढोबळे, या राजकारण्यांसह जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सोलापूरचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी या अधिकाऱ्यांसह इतर विविध साहित्यिक, कवी व रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहिल्याच दिवशी उद्घाटन समारंभात उद्घाटनासाठी आलेले राज्याचे महसूल मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणामध्ये ‘आमचे सहकारी बंधू शहाजी बापू पाटील हे ‘काय झाडी, काय डोंगर’ या वाक्यामुळे मोठे प्रसिद्ध झाले आहे. बापूंच्या या मायदेशी बोलीमुळे ते सर्वत्र ओळखले जाऊ लागल्याचे त्यांनी सांगितले. (Kay zadi kay dongar kay hatil)
संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेले आमदार शहाजी पाटील यांनीही माझ्या दोन वाक्यामुळे मी आज प्रसिद्ध झालो असल्याचे सांगून मनुष्याच्या जीवनामध्ये बोली भाषेलाच महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. संमेलनामध्ये दुपारच्या सत्रामध्ये कवी संमेलन झाले. या कवी संमेलनामध्येही कवी ज्ञानेश डोंगरे यांनी ‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल.. ओके मध्ये हाय’ ही कविताच सादर केली. रसिक प्रेक्षकांकडून या कवितेला मोठी दादही मिळाली.
राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी राजकारण्यांसह कवींनाही सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ‘काय झाडी, काय डोंगर’ या वाक्यांची भुरळ पडलेली दिसून आली.
बापूंचा जलवा
आमदार शहाजी बापू पाटील हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थी आंदोलनात काम केले आहे. काँग्रेसमध्ये अनेक वर्षे ते कार्यरत होते. दिवंगत आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या विरोधात त्यांनी अनेक पंचवार्षिक निवडणुका लढवल्या. एकीकडे शेकापचे भाई गणपतराव देशमुख हे विजय होऊन विक्रम करीत असताना दुसरीकडे शहाजी बापू पाटील हे पराभूत होण्याचा विक्रम करीत होते.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाई गणपतराव देशमुख यांनी स्वतः निवडणूक लढवता नातू अनिकेत देशमुख यांना उमेदवारी दिली. हा डाव साधत शहाजी पाटील यांनी ताकतीने ही निवडणूक लढवली आणि विजय खेचून आणला. तेव्हापासून सांगोला तालुक्यात शहाजीबापू पाटील यांचा करिष्मा दिसत आहे.
सांगोला तालुक्यातील कोणत्याही सुखदुःखाच्या कार्यक्रमात आमदार शहाजी बापू पाटील हजेरी लावतात. काय झाडी काय डोंगर काय हॉटेल या त्यांच्या डायलॉगमुळे तर त्यांना देशभरात प्रसिद्धी मिळाली आहे. या सर्व प्रसिद्धीच्या वलयाचा फायदा शहाजी बापूंची सकारात्मक इमेज बनवण्यामध्ये होताना दिसून येत आहे. सांगोला येथे झालेल्या ग्रामीण साहित्य संमेलनातील शहाजी बापूंच्या या डायलॉगवरही चांगलेच भाष्य झाल्याचे दिसून आले.