भारतासाठी महान कार्य करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात अनेक व्यक्तींचे मोलाचे योगदान आहे, त्यापैकी त्यांची पत्नी रमाबाई यांचे अतुलनीय असे कर्तृत्व आहे. त्यांचा बाबासाहेबांशी विवाह झाला, तेंव्हा त्या नऊ वर्षाच्या, तर बाबासाहेब चौदा वर्षांचे होते. त्यांनी बाबासाहेबांना खंबीर साथ दिली. स्त्री ही हिंमतवान आहे, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिले.
डॉ.बाबासाहेब हे शिक्षण, संशोधन, प्रबोधन, सामाजिक, राजकीय कार्याच्या निमित्ताने देश – विदेशात गेले, त्यावेळेस मुलाबाळांना घडविणे-वाढविणे, संसार चालविणे, आलेल्या अतिथींचे आदरातिथ्य करणे, बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रबोधन चळवळीमध्ये त्यांना साथ देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य रमाबाई यांनी निष्ठेने केले. त्यांनी जीवनात अनेक चढ-उतार पाहिले, परंतु त्या कधीच डगमगल्या नाहीत. हतबल झाल्या नाहीत. निराश झाल्या नाहीत. त्यांनी प्रतिकूल काळ पाहिला, पण त्या रडत बसल्या नाहीत. त्या हिमतीने संकटाविरुद्ध लढत राहिल्या.
कितीही प्रतिकूल काळ असला तरी रमाबाईंनी बाबासाहेबांना हसतमुखाने साथ दिली. त्यांनी संपूर्ण आयुष्य बाबासाहेबांच्या क्रांतिकार्यासाठी समर्पित केले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पती पण कधीही भौतिक हव्यास न धरता रमाबाईंनी समाजपरिवर्तनासाठी त्यांना मोलाची साथ दिली. रमाबाईंच्या त्यागाला तोड नाही. रमाबाईंसारखी त्यागी, कर्तृत्ववान पत्नी बाबासाहेबांना मिळाली, त्यामुळे बाबासाहेबांसारखा महामानव देशासाठी महान कार्य करू शकले.
स्त्री ही संकटसमयी लढणारी आहे, ती रडणारी नाही. ती कठीण काळात हताश, निराश, नाउमेद होणारी नाही, तर ती प्रयत्नवादी आहे हे रमाईने दाखवून दिले. बाबासाहेबांची लौकीकाच्या शिखराकडे वाटचाल चालू असतानाच रमाबाईचे 27 मे 1935 रोजी म्हणजे वयाच्या 37 व्या वर्षी दुःखद निधन झाले. या महामातेच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. आज त्यांची जयंती. जयंतीनिमित्त शुभेच्छा!
-डॉ.श्रीमंत कोकाटे