राजकारणशेतीवाडी
Trending

अखेर सांगोला सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध

भाई गणपतराव देशमुख यांची परंपरा अबाधित

Spread the love

सांगोला सहकारी सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या मदतीने ही निवडणूक बिनविरोध होणे शक्य झाले आहे. – डॉ. बाबासाहेब देशमुख (राज्य अध्यक्ष – पुरोगामी युवक संघटना)

सांगोला/ नाना हालंगडे
शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर प्रथमच सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध झाली. भाई गणपतराव देशमुख यांनी त्यांच्या हयातीत सुरू ठेवलेली बिनविरोध परंपरा अबाधित ठेवण्यात शेतकरी कामगार पक्षाच्या यश आले आहे.

संपूर्ण जिल्ह्यात चर्चिली जाणारी सांगोला येथील सूत गिरणीची निवडणूक अखेर आज रात्री साडे सात वाजता बिनविरोध झाली. प्रारंभी ज्यांना बिनविरोध काढण्यात आले होते. त्यांनी पक्षाच्या प्रेमापोटी माघार घेत,ज्यांनी विरोध केला होता त्यांना संधी दिली.

खरे तर दुपारी साडेतीन नंतर प्रक्रिया संपायला हवी होती. पण तसे काहीच घडले नाही. शेवटी ओढून ताणून कसा तरी मेळ घालीत अखेर रात्री उशिराने ही निवडणूक बिनविरोध झाली. देशमुख कुटुंबियातील दोघे बंधू यात बिनविरोध झाले आहेत. जरी निवडणूक बिनविरोध झाली असली तरी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नावे देण्यास टाळाटाळ केली. याचे कारण नेमके हे अद्याप समजले नाही

आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेताना प्रचंड दिरंगाई केली. त्यामुळे बिनविरोधचे चित्र स्पष्ट होण्यास मोठा वेळ लागला.

सांगोला तालुका सहकारी सूतगिरणीच्या निवडणुकीत माजी चेअरमन नानासाहेब लिगाडे यांच्यासह दिग्गज उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती. या निवडणुकीत राजकारण काय घडतंय याची तालुकावासियांना उत्सुकता लागली होती.

शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या संचालक पदाच्या निवडणूकीमध्ये ही निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न केले जात होते. मात्र निवडणूक बिनविरोध होताना मोठे राजकीय नाट्य घडले.

बिनविरोध करण्यात शेकाप यशस्वी
स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर सूतगिरणीची प्रथमच निवडणूक होत असल्याने याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी त्यांच्या हयातीत अत्यंत सचोटीने ही सूतगिरणी चालविली. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी सामंजस्याने निवडणुका बिनविरोध केल्या. भाई गणपतराव देशमुख यांच्या शब्दाला किंमत होती.

त्यामुळे विरोधकही त्यांचा शब्द मानत होते. इतर ठिकाणच्या सूतगिरणी प्रमाणे या सूतगिरणीत टोकाचे राजकारण शिरू नये अशी त्यांची धारणा होती. त्यामुळेच त्यांच्या या भूमिकेशी सहमत होऊन विरोधी पक्षाचे नेतेही निवडणूक बिनविरोध करण्यास सहकार्य करत होते. याही वेळी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी बिनविरोध परंपरा अबाधित ठेवली आहे.

यंदा भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर प्रथमच ही निवडणूक घोषित झाली. नेहमीप्रमाणे ही निवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा ठेवून शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केले.

एकूण 11 हजार 560 मतदार
सूतगिरणीच्या 11 हजार 560 सभासदांपैकी कापूस उत्पादक शेतकरी 7 हजार 93, तर बिगर कापूस उत्पादक शेतकरी 4 हजार 467 असे एकूण 11 हजार 560 सभासद (मतदार) आहेत. तर संस्था प्रतिनिधी मतदार संख्या 81 आहे.

१९८० साली उभारणी
भाई गणपतराव देशमुख यांनी शेतीबरोबरच परिसराच्या औद्योगिक विकासाकडेही अत्यंत गांभीर्याने लक्ष दिले. सांगोल्यात १९८० साली ‘शेतकरी सहकारी सूतगिरणी उभारली. आज वार्षिक शंभर कोटी रु.हून अधिक उलाढाल करणारी ही सूतगिरणी भारतातच नव्हे तर जगातील सहकारातील एक आदर्श सूतगिरणी म्हणून ओळखली जाते.

चीन, बांगलादेश, इजिप्त, मलेशिया, इंडोनेशिया या देशात येथून सूत निर्यात केले जाते. महाराष्ट्रातील इतर ठिकाणच्या सहकारी सूतगिरण्यांची अवस्था विकलांग होत असताना आबासाहेबांनी स्थापलेली ही सूतगिरणी अतिशय उत्तम काम करत आहे. याचे कारण सहकारातील सर्व दोष टाळण्याला त्यांनी प्राधान्य दिले होते.

दिग्गज उमेदवारांची माघारी
सलग 15 वर्षे सूत गिरणीचे चेअरमन राहिलेले नानासाहेब लिगाडे, माजी संचालक बाबुराव गायकवाड, शहाजीराव नलवडे, गोविंद जाधव, शिवाजी मिसाळ, विशालदीप बाबर, अंकुश येडगे या दिग्गज उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यांनी माघार घेण्याचे कारण अद्याप पुढे आले नाही.

दोघा डॉक्टर बंधूंचा लागला कस
भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर प्रथमच या सूतगिरणीच्या निवडणुकीची प्रक्रिया झाली. भाई गणपतराव देशमुख हे हयात असताना त्यांचा शब्द विरोधकही मानत होते. त्यामुळे आजपर्यंत ही निवडणूक बिनविरोध होत होती. भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर प्रथमच शेतकरी कामगार पक्ष या निवडणुकीला सामोरे गेला. भाई गणपतराव देशमुख यांच्या पश्चात पक्षाची तसेच सूतगिरणीचे धुरा त्यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख तसेच डॉ. अनिकेत देशमुख सांभाळत आहेत. निवडणूक जिंकण्यासाठी या दोन्ही बंधूंना मोठी कसरत करावी लागली.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका