सांगोला सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर पुन्हा पेटणार!

धाराशिव साखर कारखान्याने चालविण्यास घेतला भाडेतत्वावर

Spread the love

सांगोला (विशेष प्रतिनिधी) : तालुक्यातील एकमेव असलेल्या सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्याचा (Sangola Taluka Sahkari Sakhar Karkhana) बॉयलर यंदाच्या हंगामात पेटणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्य शिखर बँकेने सांगोला सहकारी साखर कारखाना हा लाँगलीज भाडेतत्त्वावर धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना चालविण्यास दिला आहे. धाराशिव साखर कारखान्याकडून रविवारी सांगोला साखर कारखान्यातील स्वच्छता, साफसफाईसह मशीनरीची दुरुस्ती कामे करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या हंगामात सांगोला साखर कारखान्याच्या मशिनरी प्रदिर्घ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा धडाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

2500 टन गाळप क्षमतेचा सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना गेली अनेक वर्षे बंद अवस्थेत होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील (NCP ex. MLA Deepakaba Salunkhe-Patil) यांच्या ताब्यात हा कारखाना आहे. या कारखान्यावर मोठे कर्ज आहे. राज्य सहकारी बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता थकबाकीदार ठरलेल्या सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाना व अक्कलकोटच्या स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव होणार असल्याची घोषणा जून २०१६ मध्ये राज्य बँकेचे अध्यक्ष डॉ. एम. एल. सुखदेवे यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आयोजिलेल्या एका बैठकीत केली होती. मधल्या काळात राज्य शिखर बँकेने आजारी असलेल्या साखर कारखान्यांच्या हिताचा विचार करून धोरणात्मक निर्णय घेतले. त्यातूनच हा निर्णय झाल्याचे दिसून येत आहे.

चालू हंगामात बॉयलर धडाडणार!
धाराशिव (जि. उस्मानाद) येथील साखर कारखाना यशस्वीपणे सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने हा कारखाना फायद्यात आहे. परिणामी तेथील कारखाना परिसराचा विकास होण्यास मदत होत आहे. अशा यशस्वी व अनुभवी कारखान्यास सांगोला साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास दिल्याने आगामी अनेक हंगाम यशस्वीपणे पार पडण्याची आशा आहे. येत्या गळीत हंगामापासून सांगोला साखर कारखान्याच्या गळीत हंगामास सुरुवात होणार आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

राज्य शिखर बँकेचे धोरणात्मक निर्णय
महाराष्ट्र राज्य शिखर बँकेकडून ५ ऑगस्ट रोजी सांगोला सहकारी साखर कारखाना लाँगलीज भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी निविदा प्रसिद्ध झाल्या होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajeet Pawar), सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Co-Operation Minister Balasaheb Patio), शिखर बँकेचे चेअरमन अनासकर, एम.डी. देशमुख, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, सांगोला साखर कारखाना चेअरमन दीपकआबा साळुंखे-पाटील यांची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक होऊन सांगोला कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याचा निर्णय झाला. ही बातमी समजताच तालुक्यातील शेतकऱ्यांत उत्साह संचारला आहे.

सांगोल्यातील ऊस लागवड क्षेत्र वाढणार!
सांगोला साखर कारखाना मागील वीसहून अधिक वर्षे बंद होता. परिणामी येथे उत्पादित होणारा ऊस इतर कारखान्यांना घालावा लागत होता. तालुक्यातील कारखाना बंद असल्याने तसेच इतर ठिकाणी ऊस नेण्यातील जादा खर्च व गैरसोईमुळे ऊस लागवड करण्यास शेतकरी धजावत नव्हते. याच परिस्थितीमुळे तालुक्यात डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. आता हा कारखाना सुरू होत असल्यामुळे शेतकऱ्यांची ही अडचण दूर होणार आहे.

पंढरपूर येथील डीवीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजित पाटील यांनी हा कारखाना चांगल्या प्रकारे चालवून कर्जातून बाहेर काढल्यास सांगोलेकरांच्या हक्काच्या साखर कारखान्यास पुनर्वेभव प्राप्त होईल, असा आशावाद या कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी व्यक्त केला आहे.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका