सांगोला तालुक्यावर जलसंकट!
टेंभू - म्हैसाळच्या पाण्यावर प्रश्नचिन्ह
![](https://thinktanklive.in/wp-content/uploads/2023/02/Capture-2023-02-15-23.08.34-780x470.jpg)
थिंक टँक / नाना हालंगडे
सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी टेंभू व म्हैशाळ या पाणी पुरवठा योजना वरदायीनी ठरलेल्या आहेत. या योजनांवरच तालुक्याचे शेतीचे आणि पिण्याच्या पाण्याचे गणित अवलंबून असते. मात्र करोडो रुपयांची थकबाकी न भरल्याने या योजनांचे पाणी यापुढे तालुकावासियांना मिळणार नाही. त्यामुळे एकप्रकारचे जलसंकटच तालुक्यावर ओढवल्याची स्थिती आहे.
![](https://thinktanklive.in/wp-content/uploads/2023/02/IMG-20230212-WA0008.jpg)
या जलसंकटातून मार्ग काढून शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड. सचिन देशमुख यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पाणीपट्टीचा घोळ
सांगोला तालुक्यामध्ये शेतीसाठी टेंभू व म्हैसाळ योजनेमधून पाणी घेतले जाते. सदर पाण्याची पाणीपट्टी ही ८१ टक्के राज्य सरकार व १९ टक्के शेतकऱ्यांनी भरावी असा निर्णय यापूर्वी झाला आहे. स्व. भाई आ. गणपतराव देशमुख यांच्या प्रयत्नातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून ही अधिसूचना काढण्यात आली होती. असे असले तरी सध्या सदरच्या पाण्याची पाणीपट्टी ही लॉसेसमुळे जास्त भरावी लागत आहे.
अशा परिस्थितीत गत दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीसारख्या असाध्य रोगामुळे संपूर्ण जनजीवन ठप्प झालेले होते. त्याकाळात टेंभू व म्हैसाळचे पाणी सोडलेले होते. परंतु, त्या पाण्यामुळे शेतकरी वर्ग हा घरी बसून असल्यामुळे व त्याच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध नसल्याने त्या पाण्याचा शेतकऱ्यांना कोणताही उपयोग झाला नाही.
![](https://thinktanklive.in/wp-content/uploads/2023/02/IMG_20230203_161329_702.jpg)
कागदोपत्री कोटींच्या घरात थकबाकी
टेंभू योजनेकडील अधिकाऱ्यांनी पाण्याची पाणीपट्टी कागदोपत्री कोटींच्या घरात नोंदविली आहे. माण नदीवरील लोकांना सोडलेल्या पाण्याची थकबाकी ही १ कोटी ६० लाख रूपये आहे. सांगोला तालुक्यामध्ये कॅनॉलने देण्यात आलेल्या पाण्याची पाणीपट्टी सव्वा दोन कोटी रूपये आहे. तर कोळा नाल्यावरील पाण्याची थकीत पाणीपट्टी ४० लाखापेक्षा जास्त आहे. याच पध्दतीने म्हैसाळचीही पाणीपट्टी थकीत आहे .
पाणी सोडण्यास नकार
या थकबाकीमुळे अधिकारी टेंभूचे पाणी नियमीत सोडण्यास नकार देत आहेत. सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यासाठी टेंभु व म्हैशाळ या योजना वरदायी ठरलेल्या आहेत. सदर योजनेतील पाणी उन्हाळयात न मिळाल्यास परत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे.
जादा दराने घ्यावे लागते पाणी
या योजनांचे पाणी आल्यास त्याचा उपयोग शेतीबरोबर पिण्यासाठीही होणार आहे. त्यामुळे एम.जी.पी. चे ज्यादा दराचे पाणी घ्यावे लागणार नाही. हे पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी ॲड. देशमुख यांनी आ. शहाजीबापू पाटील यांच्याकडे केली आहे.
उन्हाळ्यात उद्भवू शकते भीषण परिस्थिती
सांगोला तालुक्यामध्ये गतवर्षी पाऊस चांगला झाला असला तरी सुध्दा अनेक मंडलामध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. सद्यपरिस्थितीत अनेक भागात गावठाण हद्दीत एक दिवसाआड तर काही ठिकाणी दोन दिवसाआड पिण्याचे पाणी येते. तालुक्यात एम.जी.पी. चे काम सुरू असून ते काम अद्यापपर्यंत पूर्ण झालेले नाही.
त्याचा फटका पाणी पुरवठ्याला बसणार आहे. अशा परिस्थितीत आगामी महिन्याभरात सांगोला तालुक्यातील बहुतांश गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे एम . जी.पी. चे पाणी त्वरीत चालू करण्याची गरज आहे.
शेकापचे बापूंना साकडे!
संभाव्य जलसंकटावर मात करण्यासाठी शेकापचे नेते ॲड. सचिन देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांना साकडे घातले आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, ”बापू, आम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये स्व. भाई गणपतराव देशमुख यांच्यासोबत निष्ठेने काम केले असून स्व. गणपतराव देशमुख यांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे निवडणूकीच्या काळात राजकारण व इतर वेळी तालुक्याच्या विकासासाठी एकत्रित येण्याची परंपरा आपल्या तालुक्यामध्ये आहे.”
“आपणही स्व. आबासाहेब व माजी आम. दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्यासोबत विकासासाठी एकत्र येवून गावपातळीपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका एकत्रीत लढवलेल्या आहेत. सध्या आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे व विश्वासू म्हणून महाराष्ट्र राज्यात ओळखले जाता.”
“आपले नाव संबंध देशभर झालेले आहे. मी शेतकरी कामगार पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता या नात्याने पक्षीय राजकारण बाजूला ठेवून गरीब शेतकरी, बारा बलुतेदार कष्टकरी समाजासाठी आपणास कळकळीची विनंती करतो की, महाराष्ट्रात आपल्या असलेल्या नावाचा व दबदब्याचा उपयोग करून टेंभू व म्हैसाळ योजनेची मागील थकीत पाणीपट्टी माफ करावी व एम.जी.पी. चे पाणी लवकरात लवकर देणेसाठी प्रयत्न करावेत ही विनंती.”
![](https://thinktanklive.in/wp-content/uploads/2023/02/IMG-20230122-WA0011.jpg)
बापूंच्या भूमिकेकडे लक्ष
शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील हे मंत्रिमंडळातील वजनदार आमदार आहेत. सांगोला तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी करोडो रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा त्यांनी अनेकदा केली आहे. अशावेळी त्यांच्या मतदारसंघावर उद्भवलेले संभाव्य जलसंकट रोखण्यासाठी ते आपले किती वजन वापरतात, हे पहावे लागणार आहे.
हेही वाचा