आरोग्यगुन्हेगारीताजे अपडेटथिंक टँक स्पेशलमनोरंजनमाध्यमविश्वराजकारणरोजगार/शिक्षणविज्ञान/तंत्रज्ञानशेतीवाडी

समता, स्त्रीस्वातंत्र्य आणि बुद्धिप्रामाण्यवाद मांडणारे सर्वज्ञ चक्रधर स्वामी!

डॉ.श्रीमंत कोकाटे यांचा अभ्यासपूर्ण लेख Chakradhar Swami

Spread the love

“नाकाला येणारा शेंबूड आणि मासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे,ती अपवित्र किंवा अशुद्ध नाही” बाराव्या शतकात म्हणजे आतापासून आठशे वर्षांपूर्वी असे विचार मांडणारे चक्रधर स्वामी समाजक्रांतीकारक आहेत.

भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये आमूलाग्र क्रांती घडविणारे महान तत्त्वज्ञ सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांचा जन्म भडोच या ठिकाणी इसवीसन 1194 साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विशालदेव तर आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. त्यांच्या पत्नीचे नाव कमळाईसा होते. चक्रधर स्वामी यांचे पूर्वाश्रमीचे नाव हरिपाळदेव असे होते. कुमार वयामध्ये हरिपाळदेव यांनी एका युद्धात सहभाग घेतला होता, पण युद्धावर त्यांचा विश्वास नव्हता.हरिपाळदेव जसे शूर, पराक्रमी होते तसेच ते प्रेमळ आणि संवेदनशील मनाचे देखील होते. हिंसा त्यांना मान्य नव्हती. अहिंसा हाच खरा मानवाचा धर्म आहे, ही त्यांची धारणा होती. निराधार लोकांना मदत करणे हाच खरा धर्म आहे, असे त्यांचे मत होते

अत्यंत तरुण वयात चक्रधर स्वामी यांच्या मनात संसाराबद्दल विरक्ती निर्माण झाली. आपण तीर्थाटन करावे, हा त्यांचा मनोदय होता. तो मनोदय त्यांनी आपल्या कुटुंबीयांना आणि सहकाऱ्यांना बोलून दाखवला. कुटुंबीयांचा विरोध होता. पण तो विरोध डावलून चक्रधर स्वामी तीर्थयात्रेला निघाले. तीर्थयात्रा करत- करत ते अमरावती या ठिकाणी आले. एकांतामध्ये त्यांनी राजवस्त्राचा त्याग केला आणि ते एकटेच पुढे निघाले. प्रवासात ते ऋद्धिपुर या ठिकाणी येऊन पोहोचले. ऋद्धिपुर याठिकाणी गोविंदप्रभू नावाचे महान सत्पुरुष यांना भेटले. हरिपाळदेव हे गोविंदप्रभू यांच्या पुढे नतमस्तक झाले. गोविंदप्रभू यांनी चक्रधर स्वामी यांना अनुग्रह दिला आणि हरिपाळदेव यांना ते चक्रधर म्हणाले. हरिपाळदेव यांचे चक्रधर हे नामकरण गोविंदप्रभू यांनी केले.

चक्रधर स्वामी विदर्भ-मराठवाडा, तेलंगणा आंध्र प्रदेश असा प्रवास करत- परत मराठवाड्यात आले. पाथर्डी जवळील येळी या ठिकाणी आले. त्यांच्या स्मृती महानुभाव मंदिराच्या रुपांने आज देखील तेथे कायम आहेत. तेथून ते मेहकर या ठिकाणी आले.तेथे बोणाईसा यांना त्यांनी अनुग्रह दिला. आपल्या शिष्यगणांसह चक्रधर त्रंबकेश्वरला निघाले. पण वाटेत पैठण या ठिकाणी ते थांबले आणि त्र्यंबकेश्वरला जाण्याचा निर्णय त्यांनी रद्द केला. पैठण याठिकाणी चक्रधर स्वामी यांचे प्रदीर्घ वास्तव्य राहीले. तेथे त्यांनी आबाईसा, महदाईसा, उमाईसा, नागदेवाचार्य असे अनेक क्रांतिकारक घडविले.

  • सांगोल्यात डाळिंब बागांवर बुलडोझर
    चक्रधरांच्या महानुभाव संप्रदायाने भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रांमध्ये आमूलाग्र क्रांती केली. महिलांना हक्क अधिकार दिले. महादंबा ही सतत विचार करायची, प्रबोधन करायची, तत्वज्ञान सांगायची, चिकित्सा करायची, चक्रधरांना काहीतरी सतत विचारत राहायची, म्हणून चक्रधर स्वामी म्हणाले *”महदाइसा चर्चक, चिकित्सक, सतत काहीतरी पुसतसे”*. महदंबा ही ज्ञानाच्या क्षेत्रात अत्यंत अधिकारी होती.

चक्रधर स्वामी यांनी लिंगभेदाला तिलांजली दिली. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही अधिकार असला पाहिजे, ही चक्रधर यांची भूमिका होती. धर्माच्या नावाखाली स्त्रियांना बंधनात ठेवणाऱयांचा त्यांनी समाचार घेतला. शुचितेच्या गप्पा मारणाऱ्यांना चक्रधर स्वामी म्हणाले *”नाकाला येणारा शेंबूड आणि मासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे,ती अपवित्र किंवा अशुद्ध नाही”* बाराव्या शतकात म्हणजे आतापासून आठशे वर्षांपूर्वी असे विचार मांडणारे चक्रधर स्वामी समाजक्रांतीकारक आहेत.

चक्रधर स्वामी यांनी वेदप्रामाण्य नाकारलं, त्यांनी वर्णव्यवस्थेला विरोध केला. शूद्रातिशूद्रांना ज्ञानाच्या क्षेत्रात अधिकार दिला. तेलीनिच्या हातची भाकर खाल्ली व म्हणाले *”या भाकरीवरती कोणत्याही जातीचे नाव नाही, ही भाकरी तेलीनीची नव्हे, तर बाजरीची आहे. सर्व माणसे समान आहेत. भेदभाव बाळगणे मूर्खपणा आहे,”* असा त्यांचा क्रांतिकारक विचार होता. ते जसे बोलत तसेच वागत.

चक्रधर स्वामी हे अहिंसावादी होते. त्यांना युद्ध अमान्या होते.अत्याचार मान्य नव्हते. अन्याय -अत्याचार करणाऱ्यांना त्यांनी कडाडून विरोध केला. चक्रधर स्वामी म्हणाले *”तुमच्याने मुंगी देखील रांड न व्हावी”* म्हणजे मुंग्याला देखील मारू नका. मुंगीला देखील विधवा करू नका. म्हणजे सर्व प्राणीमात्रांना जगण्याचा अधिकार आहे, असे चक्रधर स्वामी यांचे विचार होते.

चक्रधर स्वामी यांनी पारतंत्र्याचा धिक्कार केला. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य असले पाहिजे. स्वातंत्र्यात सर्वांगीण प्रगती होते. स्वातंत्र्य असेल तरच मानव विचार करू शकतो आणि त्याने विचार केला तरच वैज्ञानिक, शैक्षणिक, कृषी-औद्योगिक प्रगती होईल. स्वातंत्र्याचे महत्त्व सांगताना चक्रधर स्वामी म्हणतात *”स्वातंत्र्य हाच खरा मोक्ष आहे आणि पारतंत्र्य हेच खरे बंधन आहे”*. मोक्ष याचा अर्थ मोकळेपणा, स्वातंत्र्य असा होतो. त्यांच्या संप्रदायाला महानुभाव संप्रदाय असे म्हणतात.

चक्रधर स्वामी यांनी सनातन्यांना विरोध केला. वर्णव्यवस्था मोडली. वेदप्रामाण्य नाकारले. शूद्रातिशूद्रांना, महिलांना, शेतकऱ्यांना स्वातंत्र्य दिले. त्यामुळे सनातनीव्यवस्था त्यांच्यावरती प्रचंड चिडली. यादवांचा प्रधान हेमाद्री पंडित याने पैठण या ठिकाणी येऊन चक्रधर स्वामी यांच्यावरती मारेकरी घातले. चक्रधर स्वामी यांचे डोळे, नाक आणि जीभ त्याने छिन्नविच्छिन्न केले.

चक्रधर स्वामी मागे हटले नाहीत, त्यांनी आपले प्रबोधनाचे व समाजक्रांतीचे कार्य कायम ठेवले. पुढे या हेमाद्री पंडिताने देवगिरीच्या यादवांना हाताशी धरून चक्रधर स्वामी यांचा शिरच्छेद केला. ते साल आहे इसवीसन 1274. चक्रधर स्वामी यांना अत्यंत निर्दयपणे ठार मारण्यात आले.ते उत्तरापंती गेले असे महानुभाव पंथातील कांही श्रद्धाळू व्यक्तींचे मत आहे. पण चक्रधर स्वामी हे सनातन्यांना शरण गेले नाहीत. ते मागे हटले नाहीत. ते सुंदर होते.ते निर्मळ होते. निर्भीड होते. कणखर होते, अशा महामानवाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

– डॉ.श्रीमंत कोकाटे

 

पाहा खास व्हिडिओ

 

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका