शेतकरी, कष्टकरी, दलित, महिलांच्या हिताचा संकल्प करुया : डाॅ. भाई बाबासाहेब देशमुख
थिंक टँक स्पेशल/ डॉ.नाना हालंगडे
आपण सर्वांनी 2023 या नव्या वर्षाचे जोरदार स्वागत केले आहे. अनेक भागात अनेक शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी विद्युत रोषणाई केली होती. फटाके फोडले. सामूहिक भोजनाचे कार्यक्रम झाले. गोड धोड मिठाई वाटली केली. नवीन वर्षाचे आनंदाने व मोठ्या उत्साहात स्वागत सर्वच जणांनी केले. तसे स्वागत केलेही पाहिजे.
परंतु… सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये जे लोक काम करीत आहेत. त्या माझ्यासहित इतर लोकांनी नव्या वर्षाचे स्वागत करीत असताना सरत्या वर्षामध्ये ज्या काही गोष्टी अपूर्ण राहिल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. विशेषत: सरत्या वर्षामध्ये शेतकरी खूप अडचणींमध्ये सापडला. अतिवृष्टीमुळे अनेक भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. काही नुकसानग्रस्त भागाचे शासनाने पंचनामे केले तर काही भागाचे पंचनामे झाले नाहीत. व पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना सुध्दा नुकसानभरपाई मिळाली नाही. अशा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे.
सध्या देशासहित राज्यात बेकारीचे प्रमाण रोज वाढत आहे. तरुणांना खात्रीशिर काम मिळत नाही. शिकून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या व उपलब्ध नोकऱ्या यांच्यातील तफावत कमालीची आहे. नोकरी मिळत नसेल तर त्या तरुणांना स्वताच्या पायावरती उभे राहण्याची व्यवसायाला आर्थिक मदत सरकारने केली पाहिजे. ती मदत मिळवत असताना ज्या अडचणी आहेत ना त्या अडचणी कमी केल्या पाहिजेत.
कुठलीही गोष्ट करायची म्हटले की.. कागदपत्रांची जुळवाजुळव ही सध्या सामान्यांसाठी चिंतेची बाब आहे. त्यात सुधारणा करुन पारदर्शकता आणली पाहिजे. अशा काही उपाययोजना कराव्यात की बेकारीचे प्रमाण खाली येईल. त्याच बरोबरीने छोटे मोठे व्यावसाय वाढतील. त्या दृष्टीने सर्वांनी प्रामाणीकपणे काम करण्याचा संकल्प करुया.
देशाच्या , राज्याच्या, गावाच्या व घराच्या प्रगतीमध्ये महिलांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. सध्या प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहेत. परंतु आजही समाजामध्ये महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना घडत असताना पहावयास मिळत आहेत. आजही काही ठिकाणी महिलांचा अमानुष छळ होताना दिसत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी सरकारसहित सर्व नागरीकांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.
( पुढे वाचा)
आजही शहरी भागातील महिला व ग्रामीण भागातील महिला यांच्यामध्ये तफावत पहावयास मिळत आहे. आजही ग्रामीण भागातील महिला चुल व मूल यांच्या पलीकडे गेलेल्या नाहीत. ग्रामीण भागातीलही महिलांमध्ये कष्ट करण्याची तयारी असते. त्यांच्या अंगी सुध्दा कला कौषल्य आहेत, त्याही हुशार आहेत. त्यांना फक्त संधी मिळाली पाहीजे. प्रोस्ताहीत केले पाहीजे..
ग्रामीण भागाची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल व ग्रामीण भागातील महिला सक्षम झाल्या तर ग्रामीण भागाची प्रगती होईल. हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यासाठी जे जे म्हणून काही करावे लागेल त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचा संकल्प करुया.
देशाची राज्याची प्रगती म्हणजे ठराविक अशा भागाची, ठरावीक समूहाची झालेली प्रगती म्हणजे देशाची, राज्याची प्रगती नव्हे..तर सर्व समाजघटकांची, सर्व भागाची सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे.
आजही आपल्या देशात राज्यात गरीब श्रीमंत, उच्च निच असा भेदभाव आहेच. तो भेदभाव दूर झाला पाहिजे. त्यासाठी सर्व समाज घटकांना देशाच्या राज्याच्या विकासामध्ये सामावून घेतले पाहिजे. त्यासाठी आर्थिक मदत असेल, शैक्षणीक सुविधा असतील, नोकऱ्यामध्ये प्राधान्य असेल ते प्राधान्यांने दिलेच गेले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी मनापासून प्रयत्न करण्याचा संकल्प करुया.
एका बाजुला विजेचा वारेमाप वापर होत असताना दुसऱ्या बाजुला आमच्या शेतकऱ्यांना शेतातील वीज कधी चार तास कधी सहा तास तर कधी आठ तास मिळत आहे…ती ही कमी दाबाने.. शेतकऱ्यांना हि वीज दिवसा देत नाहीत तर ती विज रात्री दिली जाते.याचा अर्थ शेतकऱ्यांना जाणून बुजून त्रास दिला जातोय. हे उघड सत्य आहे.
शेतकरी नैसर्गिक अडचणीत असताना त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे दूरच त्यांच्या शेतीमालाला किफायतशिर दर नाही,वेळेवर वीज नाही,काही भागाला पाणी नाही,अनेक अडचणीवर मात करीत शेतकरी जिवन जगत आहे… दुसऱ्या बाजूला मोठमोठ्या उद्योग पतींना भरमसाठ अनुदाने दिली जातात हा दुजा भाव नको आहे.
एका बाजूला शेतकऱ्यांना आपण अन्नदाता म्हणायचे व दुसऱ्या बाजुला त्याच शेतकऱ्यांना कसलीच मदत करायची नाही हे योग्य नाही म्हणून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचा संकल्प करुया.
असे आवाहन पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.