शेतकरी आंदोलन : मराठी साहित्यिकांची संवेदना मेली आहे काय?
सुनील अभिमान अवचार यांचा खणखणीत लेख
मराठी भाषेत शेतीवर, मातीत राबणाऱ्या बापावर, मायेवर अत्यंत हळुवार आणि संवेदनशील मनाने लिहिणारे शेकडो कवी-लेखक-कथा-कादंबरीकार आहेत! तसेच, शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे निवेदन तयार करून ते निवेदन व्हॉटस् ॲप ग्रूपवर फिरवणारीही एक अतिसेन्सेटिव्ह गॅंग आहे.
साहित्य अकादमीचे पुरस्कारप्राप्त कवी-लेखक आणि अलीकडच्या काळात पद्मश्रीची माळ ज्यांच्या गळ्यात केवळ एका विशिष्ट विचारधारेचे वाहक म्हणून पडलेली आहे, असे खंडीभर कवी-लेखक या पृथ्वीतलावर जिवंत आहेत.
ग्रेटा थनबर्ग, कमला हॅरिस तसेच आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील अनेक नामवंतांनी भाजप पक्षाच्या सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर भारतात संमत केलेल्या नवीन तीन कृषी कायद्यांविरोधात आपली एक भूमिका घेऊन सिंघू बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना यांनीही समाजमाध्यमांवरून आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे. परंतु भारतातील काही लोकांनी जे कवी-लेखक-कलावंत आहेत, अशांनी या आंदोलनाला अजूनही भरभक्कम असा कुठूनच पाठिंबा दिलेला नाही. ते केवळ प्रतिष्ठेसाठी आपले साहित्य व कला यांचा वापर करण्यात गुंग आहेत. ते कवी-लेखक-कलावंत-खेळाडू हे सर्वजण बेगडी आहेत! मेलेल्या संवेदनेचे लोक आहेत.
१. मराठी मध्यमवर्गीय लेखकांंना दलित, वंचित, शेतकरी-शेतमजुरांचे दुःख हे आपले वाटत नाही.
२. फुले-आंबेडकर-आगरकर यांच्या विचारांपासून ते कोसो दूर आहेत.
३. ब्राह्मणी वर्चस्वाचा मनात भयगंड बाळगून जगणारे हे लोक आहेत.
४. या व्यवस्थेत त्यांचे साहित्यव्यवहार नियंत्रित केले गेले आहेत.
५. पुरोगामीपणाच्या आडून त्यांचे प्रतिगामी व्यवहार सुरू आहेत.
६. पुरस्कार-मान-सन्मानाच्यासाठी ते मिंधे आहेत.
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संवेदना मेलेल्या सर्व कवी-लेखक-कलावंतांना याक्षणी श्रद्धांजली अर्पण करून आपण शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला पाहिजे!
-सुनील अभिमान अवचार
(कवी -चित्रकार)