![](https://thinktanklive.in/wp-content/uploads/2023/03/Capture-2023-03-01-19.16.00-780x470.jpg)
थिंक टँक न्यूज नेटवर्क / नाना हालंगडे
राज्यातील दहावीची परीक्षा उद्या 2 मार्च रोजी सुरू होणार आहे. त्यासाठी एकूण 15,77,256 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यामध्ये 8,44,16 मुले असून 7,30,62 मुली या परीक्षेला बसणार आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत दहावीच्या परीक्षेला यंदा 61 हजार 708 इतके कमी विद्यार्थी बसलेत. राज्यातील 533 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. विशेष बाब म्हणजे, यंदा प्रथमच एकूण 8190 दिव्यांग विद्यार्थी ही परीक्षा देत असून 73 तृतीयपंथी विद्यार्थीही दहावीची परीक्षा देत आहेत.
राज्यातून एकूण 15.77 लाख विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार असून ही परीक्षा 533 परीक्षा केंद्रांवर होणार आहे. आज माध्यमिक बोर्डाने यासंबंधी एक पत्रकार परिषद घेतली असून सर्व नियोजन पूर्ण झाल्याची माहिती दिली.
![](https://thinktanklive.in/wp-content/uploads/2023/02/IMG_20230203_161329_702-1.jpg)
- दहावीच्या परीक्षेसाठी सूचना
- विद्यार्थ्यांना सकाळी 10.30 वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचणे गरजेचे
- दुपारच्या सत्रात 2.30 वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचणे गरजेचे
- हॉल तिकीटवर देखील टाईमटेबल नमूद केलेलं आहे.
- जुने पेपर सोशल मीडियावर व्हायरल होतात त्याकडे लक्ष देऊ नये
- सहाय्यक परीक्षकाने GPS सुरू ठेवणे गरजेचे आहे.
- विद्यार्थ्यांसाठी सुरुवातीला 10 मिनीटे आणि शेवटी 10 मिनिटे अधिकचा वेळ मिळणार आहे.
राज्यात “कॉपीमुक्त अभियान”
कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा केंद्रांवर शक्यतेनुसार चित्रीकरण करण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यात “कॉपीमुक्त अभियान” राबविण्यात येणार आहे. या अभियानात राज्याचे नोडल अधिकारी म्हणून शिक्षण आयुक्त यांना आणि प्रत्येक जिल्हाधिकारी यांना तसेच समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
कॉपीमुक्त अभियान राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व जिल्हा प्रशासनाने एकत्रित काम करावे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जनजागृती करावी, अशा सूचाना देण्यात आल्या आहेत.
ऑफलाईन परीक्षा
मागील दोन वर्ष कोरोना लॉकडाउनमुळे दहावी बारावीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. मात्र यावर्षी कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन पद्धतीने परिक्षा होणार आहे. त्यामुळे कॉपी बहाद्दरावर करडी नजर असणार आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हे आदेश घेण्यात काढण्यात आले आहेत.
पाच वर्षातील विद्यार्थ्यांची संख्या
मार्च 2019 16 लाख 99 हजार 465
मार्च 2020 17 लाख 65 हजार 829
मार्च 2021 16 लाख 58 हजार 614
मार्च 2022 16 लाख 38 हजार 964
मार्च 2023 15 लाख 77 हजार 256
10 मिनिटे अधिक मिळणार
याआधी दहावी बारावी बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे आधी आकलनासाठी वाचनासाठी दिल्या जात होत्या. मात्र यामुळे कॉपीच्या घटना समोर येत असल्याने दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा नियम बोर्डाने या वर्षीपासून रद्द केला आहे.
त्यामुळे पेपरच्या आधीची दहा मिनिटे प्रश्नपत्रिकेसाठी दिली जात नसल्याने पेपरच्या नंतर दहा मिनिटे बोर्डाने वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी विद्यार्थी-पालकांनी केली होती आणि त्यानंतर ही मागणी मान्य करत बोर्डाच्या पेपरच्या निर्धारित वेळेच्या नंतर दहा मिनिटे विद्यार्थ्यांना वाढवून दिली जाणार आहेत या संदर्भातील सुधारणा बोर्डाने परिपत्रक काढून जारी केले आहेत. त्यानुसार आता, निर्धारीत वेळेनंतर 10 मिनिटे वाढवून दिली जाणार आहेत.
विद्यार्थी हित लक्षात घेऊन व पालक विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून दहावी बारावी बोर्ड परीक्षेत प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे परीक्षेसाठी वाढून मिळणार आहे.