रमाई आवास योजना, “भीक नको, कुत्रे आवर”
निधीत वाढ करा, सचिन गेजगेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
(सांगोला / नाना हालंगडे) मागासवर्गीय समाजातील लाभार्थ्यांना स्तर सुधारावा, त्यांचे जीवनमान सुधारावे म्हणून या घटकांसाठी रमाई आवास घरकुल योजना सुरू केली. मात्र, शासनाच्या जाचक अटी, मिळणारे अपुरे अनुदान यामुळे घराचे स्वप्न पूर्ण होत नाही. त्यामुळे याच्या अनुदानात वाढ करावी, यासाठी घेरडी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन गेजगे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन दिले आहे.
समाजातील मागासवर्गीय घटकांचा विकास व्हावा. त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून रमाई आवास घरकुल योजना ही उपयुक्त ठरत आहे. मात्र यासाठी शासनाच्या बऱ्याच जाचक अटी, शर्ती आहेत. जे अनुदान मिळते, त्यामध्ये हे घरकुल पूर्णही होत नाही. सध्या या रमाई घरकुलसाठी शासनाकडून 1 लाख 20 रूपये इतके अनुदान मिळत आहे. पण सध्या वाढती महागाई, सिमेंटचे, स्टीलचे वाढलेले दर यामुळे हे घरकुल पूर्ण होवू शकत नाही. या मिळणाऱ्या रक्कमेतून निम्मे घरकुलही पूर्ण होत नाही. त्यामुळे याचे हे अनुदान अडीच लाख रुपये करावे अशी मागणी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ज्यांना ही घरकुले मिळतात, असे लाभार्थी गरीब कुटुंबियातील असतात. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातून हे घराचे स्वप्न पूर्ण होत नाही. त्यामुळे अशी ही घरकुले अपूर्ण राहत आहेत. तालुक्यासह जिल्ह्यासाठी हजारो घरे मिळतात पण ती पूर्ण होत नाहीत. त्यामुळे गरीब कुटुंबीय ही गरीब राहत आहेत. तरी शासनाने याचा जरूर विचार करून, अनुदानात वाढ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.