रब्बी ज्वारीत एक कोळपणी महत्त्वाची

पीकपाणी वार्तापत्र / डॉ.नाना हालंगडे
रब्बी हंगामात कोळपणीचा फार मोठा सहभाग आहे. एक कोळपणी केली तर एक पाणी दिल्याप्रमाणे फायदा होतो. या तत्त्वांचा अवलंब करून कोरडवाहू शेती तंत्रामध्ये रब्बी ज्वारीकरिता ३ वेळेस कोळपणी करण्याची शिफारस करण्यात येते.
पडणाऱ्या पावसापैकी १० ते २० % पाणी जमिनीवरून वाहून जाते. बाकीच्या पाण्यापैकी १० % पाणी निचऱ्याद्वारे आणि ६०-७० % बाष्पीभवनाद्वारे निघून जाते. जमिनीत त्यामुळे सुमारे १० % पाणी उपलब्ध राहते, वाहून जाणारे पाणी, निचऱ्याद्वारे आणि बाष्पीभवनाद्वारे वाया जाणारे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात कसे साठविता येईल आणि त्या ओल्याव्याचा उपयोग पीक उत्पादन वाढीसाठी कसा करता येईल, हा कोरडवाहू शेतीच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे.
कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, सोलापूर येथे महत्त्वाच्या तंत्राचा शेतीमध्ये अवलंब करण्यात आला, यामध्ये प्रामुख्याने बांधबंदिस्ती, आंतरबांध व्यवस्थापन, उतारास आडवी मशागत करणे, कोळपणी करणे, आच्छादनाचा वापर शेततळी, वनस्पतींचा बांधासारखा वापर ही महत्त्वाची तंत्रे आहेत, जमिनीत ओल टिकवून ठेवण्याच्या उपायाआधी जमिनीतील ओल कशी कमी होते हे पहाणे महत्त्वाचे आहे.
जमिनीत साठवून राहिलेली ओल पिकांनी वापरणे, पृष्ठभागावरून बाष्पीभवनामुळे ओल उडून जाणे, भेगा पडल्यामुळे त्यातून बाष्पीभवन होणे, तणावाटे ओल नष्ट होणे या ४ मार्गाने ओल कमी होते. त्यातील पिकाच्या प्रत्यक्ष वाढीसाठी अतिशय कमी प्रमाणात ओल लागते. बहुतांशी (सुमारे ६० %) ओल ही बाष्पीभवनामुळे उडून जाते.
एक कोळपणी आणि अर्धे पाणी
पीक वाढताना त्याबरोबर तण वाढत असते, हे तण पाणी अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश याबाबतीत पिकांशी स्पर्धा करते. पीक उगवून आल्यावर त्यात ठरावीक दिवसानंतर कोळपणी केली जाते. त्याचा मुख्य उद्देश तण नष्ट करणे आणि वाया जाणारी ओल थोपवणे होय. तणामुळे कमी होणारी ओल, तणांचा बंदोबस्त केल्याने राखली जाते. याशिवाय माती हलवून ढिली केल्याने जमिनीच्या पृष्ठभागावर एक पोकळ थर तयार होतो. त्यामुळे उडून जाणारी ओल थोपवता येते, यामुळे ओल टिकवून धरण्यामध्ये कोळपणीचा फार मोठा वाटा आहे.
रब्बी हंगामात कोळपणीचा फार मोठा सहभाग आहे. एकदा कोळपणी केली तर एक पाणी दिल्याप्रमाणे फायदा होतो. या तत्त्वांचा अवलंब करून कोरडवाहू शेती तंत्रामध्ये रब्बी ज्वारीकरिता ३ वेळेस कोळपणी करण्याची शिफारस केली आहे. पहिली कोळपणी पीक ३ आठवड्याचे झाले असता फटीच्या कोळप्याने करावी. त्यामुळे वाढणारे तण नष्ट करून त्यावाटे होणारा पाण्याचा अपव्यय टाळता येतो.
दुसरी कोळपणी पीक ५ आठवड्यांचे झाल्यावर पासेच्या कोळप्याने करावी. त्या वेळेस जमिनीतील ओल कमी झाल्याने जमिनीला सूक्ष्म भेगा पडू लागलेल्या असतात. त्या कोळपणीमुळे बंद होतात. त्यामुळे बाष्पीभवनाची क्रिया मंद होते. हा मातीचा हलका थर जो तयार होतो.
तिसरी कोळपणी पीक ८ आठवड्याचे झाले असताना करावी. त्या वेळी कोळपणी करण्यासाठी दातेरी कोळपे वापरण्याची शिफारस आहे. जमीन टणक झाल्याने फासाचे कोळपे नीट चालत नाही. त्याकरिता दातेरी कोळपे वापरले असता ते मातीत व्यवस्थित घुसून माती ढिली करते आणि त्यामुळे भेगा बुजविल्या जातात. त्यावेळी जमिनीत ओल फार कमी असेल त्यावेळी आणखी एखादी कोळपणी केल्यास लाभदायी होते.
*पहिली कोळपणी :* तिसऱ्या आठवड्यात फटीच्या कोळप्याने
*दुसरी कोळपणी :* पाचव्या आठवड्यात पासेच्या कोळप्याने
*तिसरी कोळपणी :* आठव्या आठवड्यात दातेरी कोळप्याने कोरडवाहू रब्बी ज्वारी तयार होण्यास साधारणपणे १८० पासून २८० मि.मी. ओल लागते. त्यापैकी ४० % ओल पीक फुलोऱ्यात येण्यापासून तयार होण्याच्या अवस्थेत लागते. म्हणून प्रयत्न पूर्वक ओल साठविण्याचे उपाय करावे. लागतात.
आंतरमशागतीसाठी खुरपणी देखील अपेक्षित आहे. परंतु सुरुवातीस ज्यावेळी जमीन मऊ आहे आणि तण वाढत आहे, त्यावेळी या खुरपणीचा लाभ होतो. बैल कोळपे चालविण्याने खोलवर मशागत करता येते जमीन भुसभुशीत होऊन मातीचा थर चांगला बसू शकतो, आंतरमशागत करताना काही प्रमाणात विरळणी देखील करता येईल. मर्यादेपेक्षा जादा असलेली रोपे काढून टाकणे हा पण एक ओलावा टिकविण्याचा उपाय आहे.
- रब्बी ज्वारीस पाणी देण्याच्या अवस्था
- पिकाचा जोमदार वाढीचा काळ पेरणीनंतर २८-३० दिवसांनी
- पीक पोटरीत असताना पेरणीनंतर ५०-५५ दिवसांनी
- पीक फुलोऱ्यात असताना पेरणीनंतर ७०-७५ दिवसांनी
- कणसात दाणे भरण्याचा काळ पेरणीनंतर ९० ते ९५ दिवसांनी.
- कोरडवाहू ज्वारीस संरक्षित पाण्याची सोय असल्यास पीक गर्भावस्थेत असताना पेरणीनंतर २८-३० दिवसांनी किंवा पीक पोटरीत असताना ५०-५५ दिवसांनी द्यावे.
- २ पाणी देणे शक्य असल्यास वरील दोन्ही नाजूक अवस्थेत ज्वारीला पाणी द्यावे.
- बागायती ज्वारीस मध्यम जमिनीत तिसरे पाणी फुलोऱ्यात असताना पेरणीनंतर ७०-७५ दिवसांनी आणि कणसात दाणे भरताना ९०-९५ दिवसांनी द्यावे, भारी जमिनीत ज्वारीला चौथ्या पाण्याची गरज भासत नाही.