माध्यमांनी अहंकाराची झूल खाली ठेवावी : अजय अंबेकर

पु.ह.ओ. सोलापूर विद्यापीठाच्या राज्यस्तरीय पत्रकारिता कार्यशाळेत प्रतिपादन

Spread the love

सोलापूर : प्रतिनिधी

वृत्तपत्र हा केवळ व्यवसाय नाही. ते व्रत आहे. फक्त बातमी देणे वृत्तपत्रांचे काम नाही. व्यापक लोकहितासाठी व लोकशाही वृद्धिंगत होण्यासाठी भूमिका मांडली पाहिजे. लोकांना जे पाहिजे तेच आपण देणार असाल तर ते पत्रकारितेच्या तत्वांना धरून होणार नाही. शिक्षण देणे व प्रबोधन करणे हे पत्रकारितेचे काम असावे. सोशल मीडियाने माध्यमांच्या गेटकीपिंगची मक्तेदारी संपवली आहे. हे ध्यानात घेवून माध्यमांनी अहंकाराची झूल खाली ठेवावी, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक अजय अंबेकर यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे संकुल अंतर्गत मास कम्युनिकेशन विभागातर्फे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त बुधवार, ६ जानेवारी रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन कार्यशाळा आयोजिली होती. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या. प्रमुख वक्ते म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक अजय अंबेकर, दै. ‘सकाळ’च्या पुणे आवृत्तीचे संपादक सम्राट फडणीस उपस्थित होते. पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठाचे प्र.-कुलगुरू प्रा.डॉ. देबेन्द्रनाथ मिश्रा, विद्यापीठातील सामाजिकशास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख डॉ. निशा मुढे-पवार, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर भटकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या मीडिया स्टडिज सेंटरचे प्रमुख प्रा.डॉ. दीपक शिंदे हे उपस्थित होते.

प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.

माहिती व जनसंपर्क महासंचलनालयाचे संचालक अजय अंबेकर पुढे म्हणाले की, आपण लोकशाहीचा खरंच चौथा स्तंभ आहोत का? याचे आत्मचिंतन प्रत्येक पत्रकाराने करायला हवे. आपण कोणत्या भूमिकेतून या क्षेत्राकडे येत आहोत, याचा विचार या क्षेत्रात येणाऱ्या पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी करावा. फक्त बातमी देणे हे वृत्तपत्रांचे काम नाही. व्यापक लोकहितासाठी व लोकशाही वृद्धिंगत होण्यासाठी भूमिका मांडली पाहिजे. लोकांना जे पाहिजे तेच आपण देणार असाल तर ते पत्रकारितेच्या तत्वांना धरून होणार नाही. शिक्षण देणे व प्रबोधन करणे हे पत्रकारितेचे काम असावे. माध्यमांनी केवळ लोकांचे मनोरंजन करण्याऐवजी विविध स्वरूपाचा मजकूर देवून लोकप्रबोधन करावे.

यावेळी बोलताना दै. सकाळच्या पुणे आवृतीचे संपादक सम्राट फडणीस म्हणाले की, पत्रकारिता हे एकमेव क्षेत्र आहे की, तो एका बाजूला व्यवसाय तर दुसऱ्या बाजूला व्रत आहे.

पत्रकारितेसमोर एकूण चार आव्हाने असल्याचे दिसते. जाहिरात व्यवसाय, बदललेला वाचक, फेक न्यूज, शासकीय दमण यंत्रणा ही पत्रकारितेसमोरील आव्हाने आहेत. आपण कोणासाठी मजकूर देत आहोत, हे पहिल्यांदा ठरले पाहिजे. पत्रकारितेच्या इतिहासातून आपण धडे घ्यायला हवेत. सर्वसाधारण बातमीपेक्षा व्हाट नेक्स्ट (पुढे काय?) या पद्धतीची मांडणी आताच्या पत्रकारितेने करायला हवी. कोरोना काळात माध्यमांच्या मर्यादा व स्थान निश्चित झाले. २४ तास पत्रकारिता हे तत्त्व कोरोना महामारीने शिकवले. सध्या माध्यमांना मल्टीस्कील पत्रकारांची गरज आहे.

पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, चार विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागांनी राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजिली, ही आनंदाची बाब आहे.

पत्रकारितेच्या क्षेत्रात आल्यावर आपण कोणत्या हेतूसाठी पत्रकारिता करणार आहोत, त्याची निश्चिती झाली पाहिजे. विविध विषयांचे ज्ञान अवगत करून घ्यावे. पत्रकारितेत तुलनात्मक अभ्यासही महत्त्वाचा आहे. एखाद्या विषयात अंतर्मुख होऊन मांडणी करावी. पत्रकारितेत स्टार्टअपचेही उपक्रम असावेत. त्याची समाजाला गरज आहे. संशोधनात्मक कामाचीही जोड आपल्या पत्रकारितेला असावी. त्यामुळे आपल्या कामाचा दर्जा वाढेल. ग्राहकाला जे हवे ते देत असतानाच सप्लायरने आपल्याकडे जे अधिकचे चांगले आहे तेही देण्याचा प्रयत्न करावा. हे पत्रकारितेतही होवू शकते. त्यामुळे वाचकांना चांगली सवय लागेल व त्यातूनच लोकप्रबोधन होईल. संदर्भमूल्य प्राप्त होईल, अशी माहिती देण्याचा प्रयत्न नव्या पत्रकारांनी करावा.

पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठाचे प्र.-कुलगुरू प्रा.डॉ. देबेन्द्रनाथ मिश्रा म्हणाले की, बाळशास्त्री जांभेकर यांनी लावलेले पत्रकारितेचे रोपटे आंता वटवृक्ष झाल्याचे दिसते.

आधुनिक युगात मराठी पत्रकारिता बदललेली दिसते. जांभेकर यांनी मराठी व हिंदी भाषेत वृत्तपत्र चालविले. मराठी पत्रकारितेसाठी जांभेकर यांचे विचार व कार्य आदर्शवत आहेत.

पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे म्हणाले की, विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभाग हा सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून चर्चेत राहणारा विभाग आहे.

या विभागासाठी विद्यापीठाकडून दीड कोटी रुपये खर्चून टी.व्ही. व रेडिओची निर्मिती होत आहे. हा विभाग अधिकाधिक विकसित होण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. परिपूर्ण पत्रकार बनावेत यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. डिजिटल जर्नालिझमसारखे उपयुक्त कोर्सेस सुरु करण्यात येणार आहेत.

शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख डॉ. निशा पवार म्हणाल्या की, १८८ वर्षांची मोठी परंपरा मराठी वृत्तपत्रसृष्टीला आहे. शिवाजी विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभाग राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

५ वर्षात 3 कोटींचा निधी या विभागाला मिळाला. त्यातून अनेक कामे सुरु आहेत. नव्या पिढीला नवी उमेद देण्यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. पत्रकारितेकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सध्या कमी होताना दिसते आहे. यावरही विचार होणे गरजेचे आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर भटकर म्हणाले की, १९९० मध्ये या विद्यापीठाची स्थापना झाली.

या विद्यापीठात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. आजपर्यंतच्या सर्व कुलगुरुंनी विद्यापीठाच्या विकासासाठी चांगले प्रयत्न केले. २००६ मध्ये पत्रकारिता विभाग सुरु झाला. या विभागातील असंख्य विद्यार्थी विविध माध्यमे व शासकीय कार्यालयात चांगल्या पदावर कार्यरत आहेत.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या मीडिया स्टडिज सेंटरचे प्रमुख प्रा.डॉ. दीपक शिंदे म्हणाले की, आमच्या विभागाकडून अनेक चांगले उपक्रम राबविले जातात. नुकताच आम्ही मल्टीमीडिया स्टुडीओ उभा केला आहे.

पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रशिक्षित विद्यार्थी जावेत, असे प्रयत्न आम्ही करीत असतो.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रमुख वक्त्यांनी उत्तरे दिली. या कार्यक्रमात पत्रकारितेचे अध्यापक डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. सुमेधा साळुंखे, डॉ. गोपी सोरडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन तेजस्विनी कांबळे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. अंबादास भासके यांनी केले. केले. यावेळी मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ.रविंद्र चिंचोलकर यांच्यासह डॉ. बाळासाहेब मागाडे, चैतन्य शिनखेडे, ऋषिकेश मंडलिक या अध्यापकांसह चारही विद्यापीठातील पत्रकारितेचे अध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. झूम मिटिंग या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे हा कार्यक्रम झाला.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका