महावितरणच्या सक्तीच्या वसुली विरोधात शेकाप रस्त्यावर उतरणार
आज महत्त्वपूर्ण बैठक; जि. प. सदस्य ॲड. सचिन देशमुख
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
आधीच दोन वर्षापासून कोरोनामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. त्यातच अतीपर्जन्यन्यवृष्टी, अवकाळी पाऊस तर आता ऐन हंगामात सक्तीची वीजबिल वसुली यामुळे शेतकऱ्यांपुढे संकट उभे राहिले आहे. मागील महिन्याच्या जिल्हा परिषदेच्या बैठकीत हा विषय चर्चेचा झाला तरी पण महावितरण मनमानी पद्धतीने कारभार करीत आहे. यामुळे शेकाप रस्त्यावर उतरणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य ॲड. सचिन देशमुख यांनी थिंक टँकशी बोलताना सांगितले.
विजेचे वाढलेले दर, अनियमित सेवा तर आत्ता शेती पंपाची सुरू केलेली वीजबिल वसुली ही मनमानी आहे. यातील वीज बिलांचे आकडे तर बळीराजाला वेडावून सोडणारे. खरे तर २०१४ पासून ही वीजबिलेच दिली नव्हती. तरीही शेतकऱ्यांनी गतवेळच्या हंगामात 5 हजार रुपये भरले. त्यावेळीही अनेकांना पैसे भरल्याच्या पावत्या दिल्या नाहीत. आत्ताही ऐन हंगामात याच महावितरणने कोणतीही पूर्वसूचना न देता हे उद्योग सुरू केले आहेत.
महावितरणने वीज बिल वसुली जरूर करावी. पण याच बळीराजाला सवलत द्यावी. एकदम डीपी बंद करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे. पण सांगोला तालुक्यात महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मनमानी कारभार करीत आहेत. हे कोणालाही जुमानत नाही. त्यासाठी आज 23 नोव्हेंबर रोजी शेकापची महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आलेली आहे. शेकाप रस्त्यावर उतरून आत्ता महावितरणला जाब विचारणार आहे.
बिलधारक शेतकऱ्यांवर महावितरणची टांगती तलवार
राज्य सरकराने शेतकरी आणि सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. ज्या शेतकरी ग्राहकांचे वीजबिल थकलेले आहे, त्यांचे वीज कनेक्शन बंद करण्यात येणार आहे अशी माहिती महावितरण विभागाकडून देण्यात आली होती परंतु सांगोला तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी थकीत शेतीपंपाचे विज बिल न भरल्याने सुमारे 33 हजार 788 शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन खंडित होणार आहे.
एकूण 35 हजाराच्या दरम्यान शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन आहेत त्यापैकी 33 हजार 788 वीज कनेक्शन यांची थकबाकी असल्याने 20 तारखेपर्यंत थकबाकी न भरल्याने सांगोला तालुक्यातील हि कनेक्शन तोडण्यात आली आहेत. तालुक्यातील थकबाकीत असणारा शेतकरी मोठ्या चिंतेमध्ये दिसून येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने लागू केलेल्या वीज बिल वसुली धोरणात शेतकऱ्यांच्या अल्प प्रतिसादामुळे सांगोला तालुक्यातील शेती पंपाचे वीज कनेक्शन पुन्हा बंद करण्यात येणार आहे तसेच तालुक्यांमध्ये 33 हजार 788 शेती पंप थकबाकी मध्ये आहेत सप्टेंबर 20 ला योजना 50 ते 65 टक्के माफी होती त्यावेळी 395 कोटी थकबाकी होती सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची माफी होऊन तालुक्याला 271 कोटी भरावे लागणार होते. मार्च 21 पर्यंत 12 कोटी वसुली झाली होती.
मार्च 21 ते ऑक्टोंबर 21 पर्यंत एक कोटी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वसुली झाली होती अद्याप दोन योजनेनुसार माफी वजा जाता सांगोला तालुक्याची थकबाकी 266 कोटी सप्टेंबर अखेर आहे.
सप्टेंबर नंतर तीन महिन्याची थकबाकी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांची 45 कोटी रुपये प्रलंबित असल्याने 20 नोव्हेंबर पर्यंत थकबाकी न भरलेल्या शेतकऱ्यांचे विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची माहिती महावितरण अधिकारी आनंद पवार यांच्याकडून देण्यात आली.
याचा परिणाम सांगोला तालुक्यातील शेतकऱ्या वरती होणार आहे. महावितरण कंपनीने डी. पी. बंद करून शेतीपंपाचे वीजबिल वसुलीसाठी अशा पद्धतीचा अवलंब करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. अतिवृष्टी, गारपीट, कोरोना अशा नैसर्गिक संकटांनी ग्रासलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांकडे कुठल्याही प्रकारचे उत्पन्न नसताना वीजबिल वसुलीसाठी मानसिक छळ चालू केला आहे. शेती पंपाचे वीजबिल भरा नाही तर डी. पी. बंद, अशी सक्ती लावली आहे. शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा कोणताही विचार न करता वीज पुरवठा बंद केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास आपले सरकार हिसकावून घेत आहे. गेल्यावर्षी अतिवृष्टी झाली. गारपीट झाली. सरकारी यंत्रणेने पंचनामे करून सरकारने अनुदान जाहीर केले. शेतकऱ्यांनी कर्ज काढून केलेला खर्च पाण्यात वाहून गेला. अजूनही अनुदान आले नाही. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना कोणतीही सबसिडी वेळेवर मिळत नाही. गावात येणारा तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी, वायरमन हे सर्व शेतकऱ्यांना किती तत्काळ सेवा देतात. डी. पी. नादुरूस्त होणे, वीज तारा तुटल्यास सर्व खर्च शेतकऱ्यांना वर्गणी करून करावा लागतो. एवढे करून शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज पुरवठा मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते.
शेतकरी पिके वाचविण्यासाठी धडपड करीत असून विहीरीच्या पाण्यावर पिकांना पाणी देण्याची धडपड सुरू आहे.मात्र शेतीपंपाचे थकित बिल असणाऱ्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा बंद करण्यात येणार असल्याने वीज पुरवठा ठप्प होणार असल्याने पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके नष्ट होऊ शकतील असा प्रश्न सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पुढे येऊन उभा राहिला आहे.
सांगोला तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच गुरांचा पाण्याचा प्रश्न, गंभीरगुरांंचा पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी आहे तो पैसा खर्च केल्याने हाती पैसा नाही अशा स्थितीत नवीन पिक हाती येईपर्यंत महावितरणने दिलासा देणे गरजेचे असतांना वीज बिल भरले नाही म्हणून महावितरणने शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करीत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.याचबरोबर गुरांना देखील पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करत भटकंती करावी लागत असल्याचे सांगोला तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या वतीने सांगितले जात आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती पंपाचे वीज पुरवठा खंडित न करता सुरळीतपणे सुरू ठेवावा. जेणेकरून सध्या चालू महिन्याला राणा मध्ये असलेली विविध शेतातील पिके शेतकऱ्याच्या हाती लागतील अन्यथा महावितरण कंपनी लाखो शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये मध्ये माती कालवणार आहे असे दिसून येते.