महानुभावांचे ‘नपाळते’ पर्व
निमित्त; कुणाल रामटेके यांचा विशेष लेख
कालपासून महानुभाव धर्मियांचे ‘नपाळते’ पर्व सुरु झाले. हिंदू धर्मातील विषमतावादी तत्वज्ञान आणि आचार पद्धतीच्या विरोधात चक्रधरांनी सुरु केलेला ‘प्रतीरोध’ यासाठी कारणीभूत ठरतो.
मुळात, सर्व प्रकारची कथित धार्मिक हिंसा आणि जातीवर्णलिंगभेदाचा पराकोटीचा दहशतवाद नाकारण्याचे कार्य चक्रधरांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी त्यांच्या अनुयायांना कोणत्याही प्रकारच्या कथित धार्मिक हिंसावादी क्रीयाकलापांमध्ये सहभाग आणि तत्संबंधित सर्व प्रकारच्या चिन्हांपासून परावृत्त करत हे सारेच ‘नपाळते’ अर्थात आचरण न करण्यासारखे असल्याचे सांगितले. म्हणूनच आजही महानुभाव चक्रधरांच्या सूचनेनुसार ‘हिंदू’ प्रतीकांपासून ‘विजनास’ जातात. चक्रधरांचा हा प्रयास मुळातच अहिंसात्मक पद्धतीने केलेला महान प्रतिरोध होता.
![](http://thinktanklive.in/wp-content/uploads/2021/10/IMG-20211008-WA0004.jpg)
खरे तर, ज्या धर्म तत्वज्ञान आणि समाजात इतर मानवांचे सर्व मुलभूत अधिकारच नाकारले जातात त्या समाजात महानुभावांनी सकारात्मक हस्तक्षेप करत समतेचे नवे ‘मॉडेल’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी नामांतर, स्थानांतर आणि हिंदू धर्माचा त्याग करून धर्मांतर केले. नवे समतावादी तत्वज्ञान निर्माण करत पर्यायी जगाच्या निर्मितीचा प्रयत्न केला.
मात्र, आज काही कथित ‘विचारवंत’ महानुभावांना ‘हिंदू’ ठरवण्यात मश्गुल असून ज्या शंकराचार्य आणि पेशवाईने महानुभावांच्या विरोधात विनाकारण फतवे काढून मृत्युदंडाचे आदेश दिले, त्याच छावण्यांमध्ये त्यांना बंधिस्त करत चक्रधरांचे स्वतंत्र, समता, न्याय, बंधुता केंद्रित तत्वज्ञानाला मूठमाती देण्याचे महापातक करत आहेत. आधुनिक काळात समस्त भारतीय विवेकवादी-मानवतावादी आणि पुरोगामी चळवळींचे प्रेरणास्थान असलेले महानुभाव तत्वज्ञान आजही आपणासर्वांसाठीच मोलाचे आणि मार्गदर्शक आहे. आणि अर्थातच एक भारतीय म्हणून ते जपणे आपणासर्वांचेच कर्तव्य आहे.
– कुणाल रामटेके
रिद्धपूर, जिल्हा अमरावती.
ramtekekunal91@gmail. com