बाबासाहेब : आमदार होण्याची कुवत असलेला नेता
![](https://thinktanklive.in/wp-content/uploads/2023/01/Capture-2023-01-03-10.18.18-780x470.jpg)
थिंक टँक / एच. नाना
राजकारण हे पैसा कमावण्यासाठी, दमदाटी करण्यासाठी किंवा इतरांच्या आयुष्यातील आनंद हिरावण्यासाठी नसते. ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्यांच्या आयुष्यात सुखाचे, समाधानाचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत, हे त्यातून अपेक्षित असते. हेच सत्कार्य भाई गणपतराव देशमुख यांनी आपल्या उभ्या हयातीत केले. आबासाहेब यांच्या पश्चात तालुक्याच्या राजकारणात स्मशानशांतता आहे. अनेकांना तर आमदार होण्याची स्वप्ने रात्रीतून तीन तीनदा पडताहेत. स्वप्ने पाहून ती पूर्ण होत नसतात. त्यासाठी जिगर आणि लोकआशीर्वाद लागतो. तीच धमक आणि लोक आशीर्वादास पात्र असलेला, आमदार होण्याची कुवत असलेला नेता म्हणून भाई डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडे तालुक्यातील जनता पाहात आहे.
सांगोला तालुका हा शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील माणसं दुष्काळात पिचत होती. चार चार एकर जमीन असलेला माणूसही ऊसतोड करण्यासाठी परजिल्ह्यातील जात होता. हे चित्र बदलवण्याचा चमत्कार भाई गणपतराव देशमुख यांनी केला. हे काम चार दोन वर्षांत झाले नाही. त्यासाठी त्यांनी उभे आयुष्य पणाला लावले.
सांगोला तालुक्यात कधीही जातीय तणाव निर्माण झाला नाही. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सामाजिक सलोखा. हा सलोखा टिकवून ठेवण्याचे काम भाई गणपतराव देशमुख यांनी केले. वंचित, पीडित, अन्यायग्रस्त लोकांना त्यांनी आपलेसे केले. त्यांना हिम्मत दिली. हीच पिचलेली माणसं ढाल बनून आबासाहेब यांच्या पाठीशी उभी राहिली. बोलू लागली. चालू लागली. आबासाहेब यांचे कार्यकर्ते बनून ती यशाचे शिल्पकार बनू लागली.
बाबासाहेब आमदार बनतील का?
भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर तालुक्यात एक राजकीय उदासीनता निर्माण झाली आहे. स्वार्थाच्या, दबावाच्या राजकारणाला ऊत आला आहे. माणसांना धमकावून, छातीवर चाकू ठेवून “मला तुमच्या हृदयातले आमदार म्हणा” अशी दंडेलशाही सुरू आहे. हे चित्र काही बरे नाही. दबावशाही किंवा कपटनिती लोक उलथवून टाकतात हा जगाचा इतिहास आहे. लाखो लोकांना शस्त्राचा धाक दाखवून मान खाली घालायला लावणाऱ्या हिटलरलाही लोकांनी पायउतार व्हायला भाग पाडले. एकटा पडलेला हिटलर खचून गेला. माणसातून उठला. फाशी घेऊन मरुन गेला. हा आहे दादागिरीचा इतिहास. याच प्रवृत्तीला ठेचून काढण्याचे काम भाई गणपतराव देशमुख यांनी केले. ती जबाबदारी आता भाई डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यावर आली आहे.
पुढे वाचा..
डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मागील वर्षभरात वाढविलेला व्यापक जनसंपर्क, कामाचा सपाटा आणि विशेष म्हणजे कोणतीही सत्ता नसताना शासकीय योजना तळागाळात पोहोचविण्याचा केलेला प्रयत्न ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे.
डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा स्वभाव मृदू असला तरी त्यांची काम करण्याची पद्धत आक्रमक आहे. वीज प्रश्न किंवा अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांचा प्रश्न यावेळी त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका तालुकावासियांनी पाहिली आहे. त्यांची हीच भूमिका त्यांना आमदार पदापर्यंत घेऊन जाण्यासाठी पुरेशी आहे.
तालुक्यात सध्या अनेक प्रश्न आहेत. भाई गणपतराव देशमुख गेल्यानंतर मधल्या काळात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तालुक्यातील रस्ते डेंजर आहेत. दररोज कुठे ना कुठे खराब रस्त्यामुळे अपघात होत असतात. अनेक गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे. अनेक गावात आरोग्य, स्वच्छ्ता, पथदिवे हे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. महत्त्वाचे म्हणजे ज्या डाळिंबाने सांगोला तालुक्याला देशात नव्हे तर जगात ओळख निर्माण करून दिली ते डाळिंब संपल्यात जमा आहे. यावर कोणताही नेता बोलत नाही.
डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी स्वतः प्रयत्न करून सोलापूर येथील डाळिंब संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांना सांगोला तालुक्याच्या डाळींब बागांच्या बांधावर आणले. त्यांना वस्तुस्थिती दाखवून दिली. अधिकारी वरमले. मात्र पुढे लोकप्रतिनिधींनी पाहिजे तेवढा पाठपुरावा न केल्याने हा प्रश्न तसाच राहिला. आज तालुक्यात शेकडो एकर डाळिंब बागा काढून टाकल्या जात आहेत. याकडे इतर कोणाही नेत्याला पाहायला वेळ नाही.
अशा विविध प्रश्नांवर काम करून डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी तालुकावासियांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. भाई गणपतराव देशमुख यांच्या पश्चात बाबासाहेब देशमुख हेच तालुक्याचे नेतृत्व खंबीरपणे करू शकतील असा त्यांना विश्वास आहे.
भाई बाबासाहेब देशमुख यांच्यापुढे आव्हाने खूप आहेत. भाई गणपतराव देशमुख यांचा शेकापचा किल्ला ढासळला की आपण इथले सरंजामदार बनू अशी इच्छा ठेवून असलेल्यांशी त्यांना लढावे लागणार आहे. शिवाय पक्षात राहून इतरांशी सलगी करून सोईचे, विश्वासघाताचे राजकारण करणाऱ्यांकडेही त्यांना लक्ष द्यावे लागणार आहे.
सांगोला तालुका शेकापचा बालेकिल्ला दोन चार दिवसांत बनला नाही. तो बनविण्यासाठी भाई गणपतराव देशमुख यांनी आयुष्य खर्ची केले. तो टिकावा यासाठी डॉ. बाबासाहेब देशमुख यांना आणखी दुपटीने काम करावे लागणार आहे. हा किल्ला शाबूत राहिला तरच तालुक्याचा विकास नेटाने होईल. अन्यथा सांगोला तालुका हा विनोदी लोकांचा तालुका अशी नवी ओळख सध्या झालेली आहेच. ती खोडून काढण्याचे काम डॉ. बाबासाहेब देशमुख यांना करावे लागणार आहे.
हे काम डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केल्यास त्यांना आमदारकी फार दूर नाही. हे अंतर कमी करण्यासाठी शेकापच्या बहाद्दर कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत, हे नक्की.
(जाहिरात पुरस्कृत)