ज्वारी @ 37 रुपये किलो
सांगोला तालुक्यात ज्वारीचे क्षेत्र 23 टक्क्यांनी घटले
![](https://thinktanklive.in/wp-content/uploads/2022/11/Capture-2022-11-22-09.54.32-780x470.jpg)
पीकपाणी वार्तापत्र/ डॉ.नाना हालंगडे
यंदा गरिबांची भाकरी महागली आहे. ज्वारीने ३७ रूपये दर पार केला आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील ज्वारीचे उत्पादन घटणार आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ज्वारीचा तुटवडा जाणवणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
ऐन रब्बी हंगामात ज्वारी पेरणीच्या वेळी आक्टोबरमध्येच अतिवृष्टीचा पाऊस पडल्यामुळे व खरीप हंगामातील बाजरी, मका, सूर्यफूल पिकांच्या काढणी- मोडणीला विलंब झाला. अशातच वाफशाअभावी ज्वारीची पेरणी खोळंबल्यामुळे यंदा सांगोला तालुक्यात रब्बी ज्वारीचे क्षेत्र २३ टक्क्यांनी घटल्यामुळे गरीबांची भाकरी मागणार आहे.
तर दुसरीकडे मका उद्दीष्टापैकी अधिक तसेच गहू, हरभरा क्षेत्रात वाढ झाली तर ज्वारी ४० हजार पैकी २८ हजार ९६७ ( ७७ टक्के ) हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असल्याची धकादायक माहिती समोर आली आहे. असे जरी चित्र असले तरी सध्या हीच ज्वारी आता 37 रुपये किलो इतक्या दराने विकली जात आहे.
सांगोला तालुक्यात ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातील बाजरी, मका, सूर्यफूल, आदी पिकांची काढणी मोडणीला विलंब झाला.
अशातच सुरवातीला रब्बी हंगामातील ज्वारीसह पिकांच्या पेरणीसाठी उपयुक्त पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पावसासाठी आकाशाकडे लागले होते.
तर काही शेतकऱ्यांनी बागायती क्षेत्रावर ज्वारीच्या पेरणीसाठी चाड्यावर मुठ धरली होती. पेरणीनंतर पिकांची उगवण चांगली झाली होती. परंतु पुन्हा पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांचे डोळे पावसासाठी लागले असताना अचानक अतिवृष्टीच्या पावसामुळे चित्रच पालटून टाकले. शेतात चौहोकडे पाणीच पाणी झाल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी शेतात वापसा येण्याची वाट पहावी लागली. दरवर्षी रब्बी हंगाम १५ सप्टेंबरला सुर होवून १५ ऑक्टोंबर या कालावधीत पेरण्या पूर्ण केल्या जातात. तर काही शेतकरी ३० ऑक्टोबरपर्यंत पेरणी करतात.
अतिवृष्टीचा फटका
गतवर्षी रब्बी हंगामामध्ये ४८ हजार ९३२ हेक्टर क्षेत्रावर सरासरी पेक्षा अधिक पेरणी झाल्यामुळे ज्वारी मका धान्य साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला होता. दरम्यान यावर्षी तालुका कृषी विभागाकडून रब्बी हंगामात ज्वारी ४० हजार हेक्टर, मका ८ हजार ५०० हेक्टर , गहू ३ हजार हेक्टर, हरभरा ३ हजार ६०० हेक्टर, करडई व सूर्यफूल प्रत्येकी – २५० हेक्टर असे एकूण ५६ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे उद्दीष्ट ठेवले होते. परंतु रब्बी हंगाम पेरणीच्या काळात ऑक्टोबर महिन्यातच अतिवृष्टीचा पाऊस झाल्यामुळे शेतातून सर्वत्र पाणी पाणी झाले.
रब्बी ज्वारीचे क्षेत्र घटले
वाफस्याअभावी पेरणीला विलंब झाल्यामुळे रब्बी ज्वारीचे क्षेत्र घटले आहे तर शेतकऱ्यांनी गहू हरभरा मका पिकांच्या पेरणीवर भर दिला आहे. सांगोला तालुक्यात यंदा ज्वारी २८,९६७ ( ७७ टक्के), मका ६,७८० (१३१ टक्के), गहू १९ हेक्टर, हरभरा ३४३ हेक्टर, सुर्यफूल ११ करडई -१४ हेक्टर असे एकूण ३६,१३४ हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी झाली आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी पीक पद्धत बदलून कांदा ऊस सोयाबीन लागवडीवर भर दिला आहे.
तालुक्यात रब्बी हंगामात सुमारे २३ हजार २८० हेक्टर क्षेत्रावर ज्वारीसह मका आदी पिकांच्या (४९ टक्के ) पेरण्या झाल्या आहेत. तर परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना उर्वरित राहिलेल्या ज्वारीच्या पेरणीसाठी शेतात वाफसा येण्याची वाट पाहावी लागणार आहे. शेतकऱ्यांना नोव्हेंबर पर्यंत पेरणी करता येणार असल्याचे कृषी अधिकाऱ्याने सांगितले.
रब्बी हंगामातील ज्वारीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांचे डोळे पावसासाठी आकाशाकडे लागले होते. तर मागे झालेल्या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी ज्वारीच्या पेरणीसाठी चाड्यावर मूठ धरली होती. पेरणीनंतर पिकांची उगवण चांगली झाली असताना पुन्हा पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. परंतु सांगोला तालुक्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने चित्रच पालटून टाकले. शेतात चहुकडे पाणीच पाणी झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
पेरणीचे नियोजन फसले
यंदा कृषी विभागाकडून सांगोला तालुक्यात ४४ हजार ४७१ हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरणीचे नियोजन केले आहे. आत्तापर्यंत १८ हजार ४४२ हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारी (४९.२१ टक्के), ४ हजार ६०८ हेक्टर क्षेत्रावर मका ८९.३७ टक्के), ३१७ हेक्टर क्षेत्रावर हरभरा, सूर्यफूल ९ हेक्टर, करडई ४ हेक्टर अशा २३ हजार २८० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.
मुबलक पाणी उपलब्ध
अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नद्या, तलाव, बंधारे तुडूंब भरल्यामुळे पुढील काही महिने तरी पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. दुसरीकडे सांगोला तालुक्यात अतिवृष्टीमुळे उर्वरित रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काढणी- मळणीतील खरीप बाजरी, मका, सूर्यफूल आणि कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील ज्वारीसह इतर पिके पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
एकूण लागवड
ज्वारी २८ हजार ९६७ हेक्टर (७७ टक्के)
मका ६ हजार ७८० हेक्टर
गहू १९ हेक्टर
हरभरा ३४३ हेक्टर
सुर्यफूल ११ हेक्टर
करडई -१४ हेक्टर
३६,१३४ हेक्टर