‘जय महाराष्ट्र’चे असिस्टंट एडिटर मनोज भोयर व ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांचे आज व्याख्यान
पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठाकडून 'जागर पत्रकारितेचा' माध्यम सप्ताह
सोलापूर : प्रतिनिधी
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागातर्फे आयोजित ‘जागर पत्रकारितेचा’ या माध्यम सप्ताहात मंगळवारी ‘जय महाराष्ट्र’ या लोकप्रिय वृत्तवाहिनीचे असिस्टंट एडिटर व अभ्यासू पत्रकार मनोज भोयर तसेच दै. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
‘जागर पत्रकारिता’ या माध्यम सप्ताहामध्ये मागील चार दिवसांपासून विविध नामवंत वक्त्यांनी विद्यार्थ्यांना उदबोधक असे मार्गदर्शन केले आहे. पाचव्या दिवशी मंगळवार, दि. 5 जानेवारी रोजी ‘जय महाराष्ट्र’ या लोकप्रिय वृत्तवाहिनीचे असिस्टंट एडिटर व अभ्यासू पत्रकार मनोज भोयर हे ‘टेलिव्हिजन पत्रकारितेसमोरील आव्हाने’ या विषयावर मांडणी करणार आहेत.
मनोज भोयर हे गेल्या 22 वर्षांपासून माध्यमात काम करीत आहेत. त्यांनी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांत आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. अनेक राष्ट्रीय न्यूज चॅनलमध्ये त्यांनी मोठ्या पदावर काम केले आहे.
गुजरात दंगल, मुंबईतले अनेक बॉम्बस्फोट आणि त्याचे न्यायालयीन खटले याचं त्यांनी अत्यंत अभ्यासू व निर्भिडपणे वार्तांकन केले आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घटनांचे वार्तांकन करुन त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
गडचिरोलीच्या जंगलात थेट नक्षलवाद्यांची मुलाखत घेऊन त्यांनी प्रश्नांना वाचा फोडली आहे. ‘जय महाराष्ट्र’ या लोकप्रिय वृत्तवाहिनीत ते असिस्टंट एडिटर पदावर कार्यरत असून त्यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून अनेक राजकीय नेत्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
मागील अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या ‘टार्गेट कोरोना’ या विशेष शोची निर्मिती त्यांनी केली आहे. त्यात ते कोविड योद्ध्यांच्या मुलाखती घेत आहेत. नुकतेत त्यांनी या कार्यक्रमांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांचीही सविस्तर मुलाखत घेतली आहे. अशा अभ्यासू पत्रकाराचे विचार एेकण्याची संधी मास कम्युनिकेशन विभागाने उपलब्ध करुन दिली आहे.
‘सकाळ’चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी : ‘क्राईम रिपोर्टिंग’
दुस-या सत्रात दैनिक सकाळ सोलापूरचे सहयोगी संपादक अभय दिवाणजी हे ‘क्राईम रिपोर्टिंग’ या विषयावर बोलणार आहेत.
दिवाणजी हे महाराष्ट्रातील नामवंत पत्रकार आहेत. त्यांना अनेक वर्षे क्राईम रिपोर्टिंग केले आहे.
गुन्हे वार्तांकनात त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी यासोबतच सोलापूर जिल्ह्यातील राजकारणावरही अभ्यासूपणे लेख व वार्तांकने लिहिली आहेत.