कोरेगाव भीमा : आत्मसन्मानाची लढाई

विकास मेश्राम (गोदिंया) यांचा विशेष लेख

Spread the love

कोरेगाव भीमाची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भीमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई १ जानेवारी इ.स. १८१८ रोजी इंग्रज ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व मराठा साम्राज्य यांच्यात झाली होती. ब्रिटिशांच्या बाजूने एकूण ८३४ सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टॉंटन करीत होता. तर मराठा साम्राज्याच्या बाजूने २८,००० सैनिक होते, ज्याचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरा करीत होता. इंग्रजांच्या सैनिकांत ‘बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी’चे ५०० महार सैनिक होते, मराठ्यांच्या सैनिकांत मराठा, अरब व गोसाई या सैनिकांचा समावेश होता. पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महार, मांग व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने मराठ्यांविरूद्ध लढले आणि विजयी झाले. या युद्धात पराभूत झालेल्या पेशवाई साम्राज्याचा अस्त झाला. कोरेगाव भीमाच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर २० शहीद व ३ जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली असून स्तंभावर लिहिले आहे — ‘One of the Triumphs of the British Army of the Earth’.

महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी महाराष्ट्रासह देशभरातून बौद्ध (पूर्वाश्रमीचे महार), दलित, शीख व इतर जातीचे लोकही लाखोंच्या संख्येने येत असतात. बुद्धमूर्ती व डॉ. आंबेडकरांची प्रतिमा समोर ठेवून बुद्धवंदना घेऊन शहिद सैनिकांच्या विजयस्तंभाला मानवंदना दिली जाते.
इ.स. १८०० च्या दशकांत मराठा साम्राज्य अनेक तुकड्यांत विभागलेले होते. त्यात पुण्याचे पेशवे, ग्वाल्हेर संस्थानाचे शिंदे, इंदूरचे होळकर, बडोद्याचे गायकवाड आणि नागपूरचे भोसले असे तुकड्यामुळे कमकुवत साम्राज्य होते. ब्रिटिश साम्राज्याने ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा व नागपूर यांच्या प्रमुखांशी शांतता करार वा तह करून त्या त्या संस्थानांचा भाग आपल्या राज्याला जोडला होता. १३ जून इ.स. १८१७ रोजी पेशवे आणि गायकवाड घराण्यात महसुलावरून वाद झाला त्यात बाजीराव पेशवे यांनी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतली. बडोदा संस्थानाचा मोठा भाग पेशवाईत समाविष्ट केला. परंतु यासाठी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतल्यामुळे अप्रत्यक्षपणे तो भाग ब्रिटिशांनी आपल्या राज्यास जोडला. यामुळे मराठा साम्राज्य ब्रिटिश अधीनस्त झाले आणि पेशवे केवळ नामधारी उरले. अल्पावधीतच पेशव्यांनी ब्रिटिशांना नमवण्याचा प्रयत्न खडकीची लढाईत केला परंतु ब्रिटिशांनी तेथेही पेशव्याचा पराभव केला. ही लढाई ५ नोव्हेंबर इ.स. १८१७ रोजी झाली होती.यानंतर पेशवे यांनी तेथून सातारा येथे पळ काढला आणि ब्रिटिशांनी पूर्णपणे पुण्यावर ताबा मिळवला. पुणे हे चार्लस बार्टन बर व कर्नल जनरल स्मिथ याच्या नेतृत्वाखाली होते. आणि ते पेशव्यांचा पाठलाग करत होते. दरम्यान कर्नल स्मिथ याला भिती वाटत होती की पेशवा तेथूनही निसटून कोकणात जातील व तेथे राज्य करतील, म्हणून त्याने कर्नल बर याला कोकणात आणखी कुमक पाठवण्यास सांगितली. आणि एक जास्तीची कुमक पुण्याजवळील शिरूर येथे ठेवण्यास सांगितली.

दरम्यान पेशवे कर्नल स्मिथचा पाठलाग चुकवून निसटून जाण्यात यशस्वी झाले. परंतु दक्षिणेकडून कर्नल थेओफिलस प्रिझलर सैन्यासह तयार होताच, ते पाहून पेशव्यांनी मार्ग बदलला आणि पूर्वेकडे चालत नाशिकच्या वायव्य भागातून पुढे सरकले आणि कर्नल स्मिथ त्यांच्यावर हल्ला करेल या भीतीने ते पुन्हा पुण्याकडे वळले. इ.स. १८१७ च्या अखेरीस कर्नल बरला बातमी समजली की पेशवे पुण्यावर चालून येत आहेत तेव्हा त्याने शिरूर येथील सैन्याला मदतीसाठी तयार राहण्यास सांगितले ते सैन्य पुढे सरसावले आणि त्यांची लढाई कोरेगाव भीमा या गावात झाली. मराठ्यांचे २८,००० सैन्य होते, ज्यातील २०,००० घोडदळ, ८००० पायदळ सतत तैनात असे. कंपनी सरकाराच्या सैन्यांनी हल्ला करू नये यासाठी प्रत्येकी ६०० सैनिकांच्या तीन तुकड्या तैनात असत. या सैनिकांत अरब, गोसावी व मराठा जातीचे सैनिक असत. हे सैन्य पहिल्या फळीत हल्ला करण्यासाठी अरब सैन्याचा वापर करीत असे. तसेच त्यासाठी भाडोत्री सैनिक व त्यांचे वारस यांचाही सैन्यात वापर केला जात सैन्यात घोडदळ आणि तोफखाना असे दोन विभाग ठेवलेले असत. लढाईचे नेतृत्व बापू गोखले, अप्पा देसाई आणि त्रिंबक डेंगळे ह्यांनी केले होते. पैकी त्रिंबकजी डेंगळे हे कोरेगाव लढाईत प्रत्यक्ष सहभागी होते.

हजारो वर्षे मनुस्मृतीने ज्यांना शस्त्र धारण करण्यास मनाई करून सामाजिक दास्यशृंखलांत जखडून ठेवले होते. सामाजिक गुलामगिरी लादून ज्या पूर्वाश्रमीच्या महार जमातीचा र्‍हास घडवून त्यांचे अस्तित्व आणि ओळखच पुसून टाकली होती, तर पेशवाईत त्यांच्या गळ्यात थुंकण्यासाठी गाडगं आणि पावलाच्या खुणा पुसण्यासाठी ढुंगणाला फेसाठी बांधली होती, ज्यांना क्षुद्र मानून शस्त्र वापरण्यास मनाई करण्यासाठी ज्याअर्थी मनुस्मृतीसारखी संहिता करणे भाग पडले होते, त्याअर्थी महार ही शूर व लढवय्ये जमात असल्याचे इंग्रजांना मनुस्मृतीचे कसब आकलन झाले आणि याचा फायदा घेऊन त्यांनी शुद्रांच्या हातांत शस्त्रे दिली आणि ते मूळचे लढवय्ये आहेत, हे ऐतिहासिक कटू सत्य सिद्ध केले. ही लढाई मानवमुक्तीच्या उदयाची नांदी आणि मनुस्मृतीचा पराभव, सामाजिक गुलामगिरीचा अस्त असे त्याचे यथार्थ विश्‍लेषण केले जाते. पेशव्यांचे बलाढ्य सैन्य असूनदेखील महार रेजिमेंटच्या अवघ्या 500 सैनिकांनी हा विजय नोंदवण्यामागे त्यांच्यात निर्माण झालेली उर्मी म्हणजे त्यांनी हजारो वर्षे भोगत असलेल्या वर्णभेदावर घेतलेला तो अघोरी सूड होता. ही लढाई त्यांना चालून आलेली संधी होती आणि ती त्यांनी पुरेपूर गाजवली. त्यांच्यामध्ये प्रचंड इच्छाशक्ती निर्माण झाली. पेशव्यांनी केलेला अपरिमित सामाजिक छळ लढताना क्षणाक्षणाला त्यांच्यामध्ये चीड निर्माण करीत होता. याच लांच्छनातून मुक्त होण्याची त्यांनी ऐतिहासिक संधी सोडली नाही. ते अस्मितेसाठी लढले.

शौर्याला जात आणि धर्म नसतो हे त्यांनी दाखवून दिले. खरे तर, हा शुद्रोदय होता. महार सैनिक इंग्रजांचे चाकर होते; परंतु परकीय इंग्रजांना त्या सैनिकांच्या शौर्याचा स्तंभ उभारण्याची गरज का भासली? यातच या लढाईचा इतिहास सामावलेला आहे. आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेले महार रेजिमेंटचे संचलन गीत ‘वीर शिवाजी के बालक हम, है महार सैनिक हम, हम, हम’ या गीताने संचलन करूनच महार रेजिमेंटची तुकडी लढाईवर गेली होती.
या लढाईत पेशव्यांचे 300 पेक्षा अधिक सैन्य मारण्यात आले, तर ब्रिटिशांच्या मद्रास तोफखान्याचे 12 सैनिक, महार रेजिमेंटचे 22 सैनिक धारातीर्थी पडले. याच लढाईत शौर्य गाजविलेल्या महार सैनिकांच्या गौरवार्थ ब्रिटिश सरकारने उभारलेल्या स्तंभावर सोमनाक कमळनाक नाईक, रायनाक येसनाक नाईक, गोंदनाक कोढेनाक, रामनाक येसनाक, भागनाक हरनाक, अंबनाक काननाक, रूपनाक लखनाक इत्यादी सर्व शाहिदांची नावे कोरण्यात आली.

ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीचे ८३४ सैनिक होते.दुसऱ्या बटालियन (बॉम्बे नेटिव्ह आर्मी तुकडी क्र १०२) मधील महार जातीचे सुमारे ५०० सैनिक होते. या तुकडीचे नेतृत्व कॅप्टन फ्रान्सिस स्टॉंटन यांनी केले. अन्यअधिकाऱ्यांमध्ये, लेप्टनंटअड्जुटंट पिटसन, लेफ्टनंट जॉन्सअसिस्टंट सार्जंट विंजेट हे होते.
लेफ्टनंट स्वान्सटन नेतृत्व करीत असलेले सुमारे ३०० सैनिकांचे घोडदळ२४ युरोपियन आणि ४ तोफा चालवणारे स्थानिक मद्रासी गोलंदाज व सहा पावडर तोफा. यांचे नेतृत्व लेफ्टनंट चिसलोम करत होते. याचबरोबर साहाय्यक सार्जंट वायली यांचा तोफाखान्यात समावेश होता.

भीमा कोरेगाव येथे इंग्रजांनी बांधलेला विजय स्तंभ
पेशवा दुसरा बाजीराव नासिककडे न जाता ओझरचा घाट उतरून जुन्नर खेडावरून ता. ३० डिसेंबर रोजी चाकण येथे येऊन पोहचला, अशी बातमी स्मिथ यास कळली. पूर्वी कोंकणांतून मुंबईकडून इंग्रज फौज येत होती तिला गाठावे किंवा पुण्यावर येऊन ते शहर एकदम हस्तगत करावे असा बाजीरावाचा बेत असल्याचे स्मिथ यास दिसून आले, दोन्ही गोष्टी इंग्रजांस बिकटच होत्या. पुण्यास इंग्रजांचा बंदोबस्त अगदींच तात्पुरता होता. त्याने आपल्या मदतीस शिरूरहून जास्त फौज बोलावली होती, त्यावरून कॅ. स्टॉंटन थोडे इंग्रज सैन्य बरोबर घेऊन ता. ३१ डिसेंबर इ,स. १८१७ रोजी रात्री ८ वाजता शिरूरहून निघा, तो दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता कोरेगांवजवळ येऊन उतरला. तेथील टेकडीवरून त्याला पेशव्याची प्रचंड फौज भीमा नदीच्या काठी दिसली. स्टॉंटनची बातमी बापू गोखल्यास होतीच. घोडनदीहून वरील इंग्रज फौज पुण्यास येत होती तिची बाजीराव याांची अकस्मात गाठ पडली. बापू गोखल्यास श्रीमंतानी आज्ञा केली, की आज लढाई करून आम्हास पुढे जाण्यास मार्ग करून द्यावा. गावास लहानशी तटबंदी होती तेथे इंग्रज आश्रयार्थ गेले. त्यावर दुसऱ्या बाजूने मराठ्यांनी तोफांचा मारा सुरू केला.

जागा अडचणीची असल्यामुळे तोफा बंद करून मराठ्यांकडील अरबांनी व पायदळांनी इंग्रजांवर चालून घेतले. तेव्हा संगिनीचे व तरवारीचेच युद्ध झाले. दोन्ही बाजूंचे भरपूर नुकसान झाले. रात्री ९ वाजेपर्यंत लढाई चालून मराठ्यांचे सैन्य आपल्या छावणीकडे परत आलें. सकाळी इंग्रजांच्या सैनिकांनी पाहिले तर मराठा सैन्य निघून गेल्याचे दिसले. इंग्रजांचे २७५ मारले गेले तर १७५ जखमी झाले, त्यापैकी बहुतेक होतकरूच होते. मराठ्यांचे सुमारे ५००-६०० लोक पडले.

कोरेगावला ब्रिटिशांनी २६ मार्च १८२१ला भीमा – कोरेगाव लढाईत कामी आलेल्या महार सैनिकांचे स्मारक बांधण्यासाठी पाया घातला, अन् ६५ फूट उंचीचा मनोरा बांधला (विजयस्तंभ) या विजयस्तंभावर भीमा – कोरेगाव लढाईत कामी आलेल्या महार सैनिकांची नावे कोरली आहेत, त्यांच्याबद्दल गौरव उद्गार कोरले आहेत. ‘अविश्रांत’, ‘अन्नपाण्यावाचून सलग बारा तास ते लढले’, ‘शौर्यपूर्ण कृती’, ‘अविचल धैर्य’ शिस्तबद्ध पराक्रम, ‘त्यागपूर्ण धाडस’ ‘कौतुकास्पद सातत्य’ ( विजयस्तंभावर कोरलेल्या मूळ इंग्रजी शब्दांचा अनुवाद) या शब्दात ब्रिटिशांनी महार सैनिकांचा गौरव केलेला आढळतो. पेशव्यांच्या सैन्याच्या तीन वेगवेगळ्या तुकडय़ा इंग्रज सैन्याला कोंडीत पकडून सर्व बाजूंनी हल्ला केला व तोफगोळ्यांचा मारा करीत त्यांचे निसटण्याचे सर्व मार्ग बंद केले. अशा वेळी महारांची बहुसंख्य असलेल्या इंग्रज सेनेने निकराचा प्रतिकार दिवसभर करून रात्री नऊ वाजण्याच्या सुमाराला पेशव्यांच्या सैन्याला माघार घेण्यास भाग पाडले. त्यात ४० सैनिक कामी आले. त्यात बहुसंख्य महार सैनिक होते. म्हणून ही लढाई महारांनी जिंकली हा इतिहास आहे.

महार जमातींच्या गौरवशाली पराक्रमाचा एक मोठा इतिहास आहे. पश्चिम व मध्य भारतातील या जमातीने आपले अतुलनीय शौर्य १८१८ साली भीमा- कोरेगाव, १८२६ साली काठियावाड, १८४६ साली मुलतान, १८८० साली कदाहार येथे दाखविले.


१९४१ साली या गौरवशाली परंपरेला ‘संघटनात्मक’ स्वरूप प्राप्त झाले. ‘महार रेजिमेंट’च्या स्थापनेने व्हाइसरॉयच्या युद्ध सल्लागार समितीवर असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रयत्न यामागे होते. हा काळ दुसऱ्या महायुद्धाचा. १९४६ साली ‘महार रेजिमेंट’ ही ‘मशिनगन रेजिमेंट’ म्हणून ओळखली जाऊ लागली. आजही ‘महार रेजिमेंट’च्या मानचिन्हावर कोरेगाव विजयस्तंभाच्या बरोबरीने दोन क्रॉस मशिनगन आणि मध्यभागी ‘एम. जी. ही आद्याक्षरे दिसतात.
प्रतिवर्षी 1 जानेवारी या दिवशी या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमा-कोरेगाव येथे तत्कालीन ब्रिटिश लष्कराची तुकडी दाखल होऊन विजयस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देत असे. आज भारतीय लष्कराची तुकडीदेखील विजयस्तंभाला मानवंदना देते. खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभ आपला प्रेरणास्रोत मानला होता. 1 जानेवारी 1927 रोजी त्यांनी आपल्या सहकार्‍यांसोबत विजयस्तंभाला भेट दिली. या समरभूमीतूनच त्यांनी मानवमुक्तीचे रणशिंग फुंकले होते.

विकास मेश्राम गोदिंया
(मोबाईल नंबर ७८७५५९२८००)

थिंक टँक लाईव्हच्या सर्व माध्यमांवर प्रसारित किंवा प्रकाशित होणा-या मतांशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका