“आपल्या समाजात आधीपासून LGBTQ समूह”
मोहन भागवतांचं मोठं विधान
![](https://thinktanklive.in/wp-content/uploads/2023/01/Capture-2023-01-14-22.37.03-780x470.jpg)
थिंक टँक : नाना हालंगडे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत एलजीबीटीक्यू (LGBTQ+) समूहाबाबत मोठं विधान केलं आहे. “आपल्या समाजात आधीपासून एलजीबीटीक्यू समाज आहेत,” असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. तसेच याचं उदाहरण म्हणून त्यांनी जरासंधाचे दोन सेनापती हंस आणि डिंभकचं उदाहरण दिलं. ते ९ जानेवारीला संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या साप्ताहिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
मोहन भागवत म्हणाले, “काही लहान लहान प्रश्न मध्ये मध्ये येत असतात. मात्र, माध्यमं त्या प्रश्नांना फार मोठं करून दाखवतात. कारण कथिक नव्या डाव्या विचाराच्या लोकांना ती गतिशीलता वाटते. तो प्रश्न म्हणजे एलजीबीटीचा प्रश्न. मात्र, हा प्रश्न आजचा नाही. आपल्या समाजात आधीपासून हे समूह आहेत, पण आजपर्यंत कधी त्यांचा आवाज झाला नाही. ते लोक जगत राहिले.”
“आपली परंपरा एलजीबीटी समुहाची व्यवस्था करत आली आहे”
“आपली परंपरा कोणताही आरडाओरडा न करता एलजीबीटी समुहाची व्यवस्था करत आली आहे. असाच विचार पुढेही करावा लागेल. कारण इतर गोष्टींनी उत्तर सापडलेलं नाही आणि सापडणारही नाही, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे संघ आपल्या अनुभवाला विश्वासार्ह मानून काम करत आहे,” असं भागवत यांनी सांगितलं.
“आपल्या समाजाने एलजीबीटी समूहाला सह्रदयपणे स्वीकारलं”
“आपल्या समाजाने विना आरडाओरडा करता एलजीबीटी समूहाला सह्रदयपणे स्वीकारलं. तेही एक जीव आहेत आणि त्यांनाही जीवन जगायचं आहे हा विचार करून त्यांना समाजात सामावून घेण्याचा एक मार्ग काढला. आपल्या समाजात तृतीयपंथी लोकांना जागा आहे. तृतीयपंथी हा प्रश्न नाही, तर तो एक समूह आहे. त्यांचे देवी-देवताही आहेत. सध्या तर त्यांचे महामंडलेश्वरही आहेत. ते कुंभात येतात आणि त्यांना तेथे जागाही मिळते,” असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं.
“आपल्या परंपरेत एलजीबीटी समुहाला सामावून घेतलं आहे”
मोहन भागवत पुढे म्हणाले, “एलजीबीटी समूह समाजाचा भाग आहेत. घरात बाळाचा जन्म झाल्यावर ते गाणं म्हणायला येतात. परंपरेत त्यांना सामावून घेतलं आहे. त्याचं जगणं वेगळंही सुरू असतं आणि काही ठिकाणी ते समाजाशीही जोडले जातात. आम्ही त्यावर कधी आरडाओरडा केला नाही. आम्ही त्याला आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय केलं नाही. असाच एलजीबीटीचा प्रश्न आहे.”
“जरासंधाच्या दोन्ही सेनापतींमध्ये एलजीबीटीप्रमाणे संबंध”
“जरासंधाचे दोन सेनापती होते. हंस आणि डिंभक. ते इतके मित्र होते की कृष्णाने अफवा पसवली की, डिंभकाचा मृत्यू झाला, तर हंसाने आत्महत्या केली. त्यांनी दोन सेनापतींना असं मारलं. त्या दोघांचे असेच एलजीबीटीप्रमाणे संबंध होते. आपल्याकडे हा समूह होताच. माणूस निर्माण झाला तेव्हापासून एलजीबीटी हा माणसाचा एक प्रकार आहेच,” असंही मोहन भागवतांनी नमूद केलं.
“जनावरांमध्येही एलजीबीटीप्रमाणे प्रकार असतात”
“मी जनावरांचा डॉक्टर आहे, तर जनावरांमध्येही एलजीबीटीप्रमाणे प्रकार असतात. ही एक बायोलॉजिकल अवस्था आहे. एलजीबीटी समूह त्याचाच भाग आहे. मात्र, त्याचा फार मोठा प्रश्न तयार करण्यात आला. तेही समाजाचा भाग आहेत. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यांना त्यांचा एक खासगी अवकाशही मिळावा आणि त्यांना इतर समाजाप्रमाणे आम्हीही आहोत असं वाटावं असा सहभागही करता यावा.”