शहाजीबापूंचा बॉम्ब; भाजप, राष्ट्रवादी आणि शेकापमध्येही निघाला धूर
बापूंच नेमकं चाललंय तरी काय?
सांगोला : नाना हालंगडे
आपल्या खुमासदार शैलीमुळे नेहमी चर्चेत असलेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी एक राजकीय बॉम्ब टाकला आणि तिकडे भाजप, राष्ट्रवादी आणि शेकापमध्येही नुसता धूर निघाला. त्याचं कारणही तसंच आहे. 18 वर्षानंतर पुन्हा आमदारकी मिळताना भाजपच्या साथीसोबत राष्ट्रवादी आणि शेकाप यांचाही छुपा पाठिंबा मिळाला. आमदारकीची टर्म संपत आली तरी आपल्या पक्षाच्या सरकारकडून साधी चौकशीही होत नसल्याची जणू खदखद त्यांनी व्यक्त केली.
पंढरपूर येथील डॉ.बी. पी. रोंगे हॉस्पिटलचे उदघाटन भाजप खासदार रणजित निंबाळकर, भाजप आमदार समाधान अवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुुख व भाजप नेत्यांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली. राज्यातील सर्वच मीडियाने याची दखल घेतली.
बापू नेमके काय म्हणाले ते जरा वेळ काढून निवांत वाचा..
आम. शहाजीबापू पाटील म्हणाले की , खासदार रणजित निंबाळकर यांच्यामुळे पुन्हा आपल्याला आमदारकी मिळाली. या निवडणुकीत भाजपचे माझ्यावर 24 तास लक्ष होते. सारखे काही अडचण आहे का विचारायला फोन यायचे. तब्बल 18 वर्षानंतर पुन्हा आमदारकी मिळताना यंदा भाजपच्या साथीसोबत राष्ट्रवादी आणि शेकाप यांचाही छुपा पाठिंबा मिळाला. मात्र निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेकडून गप लांब बसायचं, गडबड करायची नाही अशी तंबीही मिळाली होती. त्यामुळे आम्हाला मंत्रिपद नाही मिळाले ठीक. मात्र 30-30 वर्षे निवडून येणाऱ्या राष्ट्रवादीच्या बबनदादा शिंदे यांनाही डावलले आहे.
आमचा कोणी विचार करील असे वाटत नाही
या सरकारमध्ये आम्हाला कोण खाईल किंवा आमचा कोणी विचार करील असे वाटत नाही असे सांगताना घर की मुर्गी दाल बराबर आहे , अशा शब्दात स्वतःच्याच पक्षाला टोले लगावले.
रोज बोकडं कापली जातात
माझ्या मतदारसंघातील लोकांना माझ्याकडे कामापेक्षा जेवायला जाणे महत्वाचं वाटते. रोज बोकडं कापली जातात आणि आताही मला पुन्हा मला तिकडेच जेवायला जायचे आहे असे सांगत आता वजन कसे कमी व्हायचे अशी स्वतःवरच शेरेबाजी केली.
टाकाटाकी कार्यक्रम बंद
सध्या माझे हात थरथरतात हे पाहून खासदार साहेबांनी सगळे टाकाटाकी कार्यक्रम बंद ठेवायला सांगितले आहेत . मात्र मी जेवायला नाही गेलो तर मतदार नाराज होतात असंही ते म्हणाले.
भाषण संपले….
नेमकी कोणाची मदत?
आम. शहाजीबापू पाटील हे आमदार होण्यामागे नेमका कोणाचा हात आहे हे बापूनाच ठावूक. शिवसेना व भाजप, राष्ट्रवादी सोबतच शेकापाचाही छुपा पाठिंबा मिळाल्याचे ते सांगत आहेत. नेमके खरे काय? याबाबत भाजप, राष्ट्रवादीसोबतच शेकापनेही खुलासा करणे अपेक्षित आहे.
आम. शहाजीबापू पाटील हे आमदार झाल्यापासून तालुक्यात शासकीय अधिकाऱ्यांची अनागोंदी सुरू आहे. कोणतीच महत्त्वाची कामे होताना दिसत नाहीत. अनेक महत्वाचे विषय प्रलंबित आहेत. निदान बापूंनी सरकारवर आरोप करण्या ऐवजी आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करून जनतेचे प्रश्न सोडवावेत.
हे सर्व बोलण्यामागील छुपा सुत्रधार कोण आहे? याचाही जनतेला प्रश्न पडला आहे.