भाईंच्या देवराईची पोलिसांनी केली पाहणी
हल्लेखोरांच्या मुसक्या आवळणार, संशयितांची नावे उघड होतील
भाईंची देवराई हा प्रकल्प कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. पक्ष, संघटना बाजूला ठेवून अनेकांनी विविध प्रकारची मदत केली आहे. भाई गणपतराव देशमुख यांचे नाव दिले म्हणून या प्रकल्पाकडे राजकीय हेतुने पाहून पुरोगामित्वाचा टेंभा मिरवत जातीयवाद पेरणाऱ्या पक्षाकडून या पद्धतीचे कृत्य झाल्याचा संशय पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.
सांगोला / विशेष प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील डिकसळ येथील वृक्ष प्रकल्प भाईंच्या देवराई परिसरातील बॅनर अज्ञात व्यक्तीनी बुधवारी रात्री फाडून त्याच ठिकाणी विष्टा टाकून निंदनीय प्रकार केला होता. त्यानंतर ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर निषेधाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. गुरुवार, 16 डिसेंबर रोजी सांगोला पोलिसांनी घटनास्थळी भेट देत परिस्थिती जाणून घेतली. नासधूस करणाऱ्या संशयितांची नावे सांगा, आम्ही त्यांच्या मुसक्या आवळतो, असे सांगितले. संशयितांची नावे लवकरच पोलिसांना दिली जाणार आहेत.
डिकसळ गावच्या वैभवात भर घालणारी, भाईंची देवराई ही राज्यभर नावारूपाला आलेली आहे. यामध्ये 118 प्रकारची सर्व प्रकारची 1120 झाडे असून, झाडे चांगल्या प्रकारे डोलू लागली आहेत. ही देवराई लोकसहभागातून साकारली असून, काही विघ्नसंतोषी लोकांना हे पाहवत नाही. याअगोदरही दोनवेळा हे बोर्ड फाडले होते. गप्प बसल्याचा गैरफायदा घेत विघ्नसंतोषी लोक अती धाडस करीत आहेत. त्यानंतर आता तिसऱ्यांदा हे बॅनर बुधवारी मध्यरात्री फाडले आहेत. तर त्याच ठिकाणी विष्टाही टाकण्यात आलेली आहे. दरम्यान याची माहिती बुधवारी सायंकाळी 6 वाजता समजल्यानंतर लोकांची पाहण्यासाठी गर्दी होवू लागली. बातमी प्रसारित झाल्यानंतर अनेकांचे निषेधाचे मेसेज व फोन येवू लागले.
गुरुवारी दुपारी सांगोला पोलिस ठाण्यातील पो.हे कॉ. धनजय माने व पोलिस पाटील अनिल कुलकर्णी यांनी घटनास्थळाला भेट देत माहिती जाणून घेतली.
लोकहिताच्या कामाला गालबोट नको
भाईंची देवराई हा प्रकल्प कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. तहहयात गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी जनतेशी प्रामाणिक राहून लोकसेवा करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून भाई गणपतराव देशमुख यांचे नाव या प्रकल्पास देण्यात आले आहे. या प्रकल्पात पक्ष, संघटना बाजूला ठेवून अनेकांनी विविध प्रकारची मदत केली आहे. हा पर्यावरण पूरक प्रकल्प आहे. पुढच्या कैक पिढ्यांना हा प्रकल्प मायेची सावली आणि ऊब देणारा आहे. असे असताना भाई गणपतराव देशमुख यांचे नाव दिले म्हणून या प्रकल्पाकडे राजकीय हेतुने पाहून पुरोगामित्वाचा टेंभा मिरवत जातीयवाद पेरणाऱ्या पक्षाकडून या पद्धतीचे कृत्य झाल्याचा संशय पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत. अंधारात हा हल्ला करणाऱ्या भेकड लोकांची नावे लवकरच निष्पन्न होतील. त्यांना जेलची वारी घडेल, हे निश्चित.