शाळा २३ दिवसानंतर पुन्हा बंद
२८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबरपर्यंत शाळांना सुट्टी; पहिली ते चौथीचे वर्ग दीवाळीनंतर सुरू
सांगोला/ नाना हालंगडे
गेली दीड वर्षापासून कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा ४ ऑक्टोबर रोजी सुरू झाल्या होत्या, पण दीपावलीमुळे शाळांना १३ दिवस सुट्टी देण्यात आली आहे. ही दीपावली सुट्टी २८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर पर्यंत देण्यात आली आहे. राज्याचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
कोरोनामुळे गेली दीड वर्षापासून शाळा बंदच होत्या. फक्त ऑनलाईन शाळा सुरू होत्या.
पण कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने ५ ते १२ चे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले होते. अशातच महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरू झाली. दीपावली सणामुळे शाळा केवळ 23 दिवसच चालल्या.
अशातच राज्य शिक्षण मंडळाने २७ ऑक्टोबर रोजी परिपत्रक काढून शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे दीड वर्षानंतर गजबजलेल्या शाळा २८ ऑक्टोबरपासून बंद राहणार आहेत.
शाळांसह सर्व वसतिगृहे सुरु झाली अन् पुन्हा बंद झाली. आता दीपावलीनंतर १ ते ४ पर्यंतचे वर्गही पुन्हा २ वर्षानंतर सुरू होत आहेत. दीपावली सुट्टी 13 दिवसाची असणार आहे.