..अखेर ना. रामदास आठवले जागे झाले
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार
टीम थिंक टँक लाईव्ह :
उत्तर प्रदेशातील हाथरस येथील मुलीवरील बलात्कार व हत्याकांडप्रकरणी संपूर्ण देशभरातील वातावरण तापले असताना केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे चिडीचूप होते. त्यांच्या या बोटचेपी भूमिकेमुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर टिकेचा भडीमार होताच त्यांनी मौन सोडले असून याप्रकरणी त्यांनी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत ना. आठवले यांचे प्रसिद्धीप्रमुख हेमंत रणपिसे यांनी शुक्रवारी रात्री उशीरा प्रसिद्धीपत्रक जारी केलंय.
खा. संजय राऊतांनी केली टीका
शिवसेना खा. संजय राऊत यांनी काल रामदास आठवले यांच्यावर टीका करत आठवले यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. चित्रपट अभिनेत्रीसाठी आवाज उठवणारे, पत्रकार परिषद घेणारे आठवले कुठे गेले असा सवाल उपस्थित केला होता. दरम्यान, ना. आठवले यांच्यावर देशभरातून सोशल मीडियाद्वारे टीकेचा भडीमार होत होता. अखेर आठवले यांनी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत ना. आठवले यांचे प्रसिद्धीप्रमुख हेमंत रणपिसे यांनी शुक्रवारी रात्री उशीरा प्रसिद्धीपत्रक जारी केलंय.
त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “हाथरसच्या मागासवर्गीय मुलीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा करावी यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले 3 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उत्तर प्रदेशच्या राज्यपाल माननीय आनंदीबेन पटेल यांची लखनौ येथे भेट घेणार आहेत.
हाथरसमधील दलित मुलीच्या सामूहिक अत्याचार आणि हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवुन लवकरात लवकर आरोपी नराधमांना फाशीची शिक्षा करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षातर्फ़े ना रामदास आठवले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे करणार आहेत.
सामूहिक अत्याचाराने मृत्युमुखी पडलेल्या दलित मुलीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यास हाथरस येथे आज केंद्रिय राज्यमंत्री ना.रामदास आठवले जाणार होते. मात्र हाथरस जिल्हा प्रशासनाने विनंती केल्यामुळे हाथरसला जाण्याचा दौरा पुढील आठवड्यात आयोजित करणार असल्याचे ना. रामदास आठवले यांनी जाहीर केले.
हाथरसमध्ये जाण्यास काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रशासनाने विरोध केल्यामुळे काँग्रेसने देशात मोठे आंदोलन केले होते. मात्र तसे आंदोलन काँग्रेसने हाथरस मधील बळी गेलेल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ करायला पाहिजे होते. असे मत ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.”