कोरोना, लॉकडाऊन आणि लग्न
विशेष लेख : मुबारक शेखजी
कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग ठप्प झाले होते. भारतातदेखील लॉकडाऊनचा प्रयोग करण्यात आला. लॉकडाऊन यशस्वी झाला की नाही? हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. पण या लॉकडाऊनमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या. त्यामधीलच एक म्हणजे लग्न.
लग्न म्हटले की सोने, चांदी , कपडे, हॉल, मंडप, जेवण, फोटो, डॉल्बी अश्या अनेक गोष्टींचा एकच भडीमार सुरू व्हायचा. वास्तविक पाहता लग्न तर प्रत्येकाची एक मूलभूत गरज असते. शक्यतो सगळ्यांना लग्न करायचेच असते, मग ते गरिब असो किंवा श्रीमंत, फरक पडत नाही.
गेल्या काही वर्षांपासून आपण या लग्नाला एवढं महाग करून टाकलो होतो की गरीब मुला-मुलींना लग्न करणे अवघड होऊन बसले होते. लग्न म्हटले की कर्ज काढा, लग्न करा लग्नानंतर कर्ज फेडा हेच सूत्र होऊन गेले होते. याच लग्नाच्या कर्जामुळे अनेक शेतकरी बापांना आत्महत्या कराव्या लागल्या.
मुलीचे लग्न करायचे म्हटले की प्रत्येक बापाला घाम फुटतो. कारण आजकाल लग्न तेवढे महाग झालेले आहेत. पण या कोरोनाच्या काळात लग्न फार स्वस्त होऊन गेली. जास्त लोकांना निमंत्रण नाही, जास्त जेवण नाही, हॉलची झंझट नाही, मंडपची चिंता नाही, डॉल्बीची गरज नाही. अश्या प्रकारे थोडा का होईना मुलींच्या आई वडिलांना कष्ट कमी सोसावे लागले.
कोरोनाच्या काळात लग्न सोपे आणि साधे होऊ शकले, तर कोरोनाच्या नंतरही आपण सारे मिळून सोपी आणि साधी लग्न करू शकतो, हे या संकटरूपी कोरोनाने नक्कीच शिकवले. तर चला प्रतिज्ञा करूया की मुलीचे असो अथवा मुलाचे लग्न तर साधेपणानेच करणार. कमीतकमी कर्ज काढून तर लग्न करणार नाही.
लेखक : मुबारक शेखजी