श्रीकांत देशमुख यांना पत्रकारांनी धरले धारेवर
स्टंटबाजी न करण्याचा दिला सल्ला
सोलापूर : बुलेट ट्रेनचा मार्ग बदल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यासाठी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेल्या भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना पत्रकारांनी चांगलेच धारेवर धरले. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याऐवजी बुलेट ट्रेन प्रकरणी आंदालनाची स्टंटबाजी करू नका असा सल्ला दिला.
त्याचे झाले असे, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बुलेट ट्रेनचा मार्ग बदल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला, यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी एकीकडे देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांचे विकासाचे धोरण पाहता सोलापूरचा मार्ग बदलला जाणार नाही असेही सांगितले.
तसेच खासदार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी व खासदार रणजितसिंह निंबाळकर या दोन्ही नेत्यांनी याबाबत पाठपुरावा केला आहे, जिल्हाधिकाऱ्यां सोबत बैठक घेतली आहे त्यामुळे कोणताही परिणाम होणार नाही अशीही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांचे व्हायरल झालेल्या पत्रावर भाष्य करताना त्यांनी हा राष्ट्रवादीचा डाव आहे, शिवसेना संपवण्याची म्हणूनच पत्र एवढं व्हायरल झाले आहे असाही आरोप देशमुख यांनी केला
यावर पत्रकारांनी हा विषय वरिष्ठ पातळीवरचा असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला असताना खासदार पाठपुरावा करत असताना तुम्ही पत्रकार परिषद घेण्याची स्टंटबाजी का केली? असा थेट सवाल केला.
यावेळी पत्रकारांनीच जिल्हाध्यक्षांना धारेवर धरले. तेव्हा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना पत्रकारांच्या प्रश्नाला व्यवस्थित उत्तर देता आली नाहीत.
कोण आहेत श्रीकांत देशमुख
श्रीकांत देशमुख सांगोला तालुक्यातील भाजपचे आक्रमक कार्यकर्ते आहेत. ते यापूर्वी काँग्रेसमध्ये सक्रिय होते. ते मूळचे जवळा येथील आहेत. देशमुख यांची भाजपमधील कामगिरी पाहून पक्षाने त्यांना काही महिन्यांपूर्वी भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष हे पद दिले आहे. हे पद मिळाल्यापासून श्रीकांत देशमुख हे आक्रमकपणे जिल्ह्यात विविध आंदोलने करीत आहेत. विविध प्रश्न घेवून ते सातत्याने चर्चेत राहात आहेत. हा आक्रमकपणा काहींना रुचत नसल्याचे दिसत आहे.काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते पुरुषोत्तम बरडे व श्रीकांत देशमुख यांच्यामध्ये राजकीय मुद्द्यावरून मोठा वाद झाला होता. तो संपतो न संपतो तोच पत्रकारांनी त्यांना आंदोलनाच्या मुद्द्यावरून धारेवर धरल्यामुळे भाजपमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
हेही पाहा : सांगोला तालुक्यात पहिल्याच दिवशी १३ हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती