नरकाचा अभिमान का बाळगावा?
डॉ. श्रीमंत कोकाटे यांचा बेधडक लेख
आर्य, सूर, म्हणजे विदेशी लोक होत. या थेअरीला जसे ऐतिहासिक, प्राच्यविद्येत संदर्भ आहेत तसेच पुरातत्त्वीय (अर्कालॉजीकल) संदर्भ देखील आहेत. आर.एस.शर्मा, मॉर्तीमर व्हीलर, गॉर्डन चाईल्ड हे अनेक इतिहासकार, पुरातत्वशास्त्रज्ञ यांनी मांडलेले आहे.
स्वर्ग, नरक या संकल्पना वास्तव नाहीत, त्या काल्पनिक आहेत, असे चार्वाक संप्रदाय सांगतो. वर्धमान महावीर, गौतम बुद्ध, संत तुकाराम महाराज यांनी स्वर्ग, नरक या कल्पना नाकारलेल्या आहेत. गरिबांना स्वर्गाचे आमिष आणि श्रीमंतांना नरकाची भीती दाखवून लुटण्यासाठी स्वर्ग-नरकाच्या कल्पना आल्या, हे स्पष्ट होते. स्वर्ग-नरक रिटर्न असा कोणीही व्यक्ती अजून जगात कोणालाही भेटला नाही.
नरक जर वास्तवात नसेल तर ही संकल्पना आली कोठून, त्याची युत्पती काय आहे ? याचा शोध प्रथमतः प्राच्यविद्याविद शरद पाटील यांनी लावला. आर्यांच्या आक्रमणाचा प्रतिकार करणारे अनेक असुर गण भारतात होते, त्यापैकीच नर गणाचे असुर लोक होते , ते खूप कष्टाळू, प्रामाणिक, शूर होते. ते कृषक होते. त्यांना शेतीची कला अवगत होती. नरक गणाच्या मातेचे नाव भूदेवी होते. म्हणजे हा कृषक गण होता. त्यांनी उत्तम शेती केली, धरणे बांधली, किल्ले बांधले, उत्तम प्रशासन व्यवस्था निर्माण केली.
गाळपेऱ्याचा शेतीनंतर असूर हे सामुदायिक शेतीत उतरले, कारण वाढती लोकसंख्या, शेतीचे अवगत झालेले प्रगत तंत्रज्ञान होय. असुर लोक हे अत्यंत लोककल्याणकारी होते. आर्यांच्या आक्रमणामुळे ते दक्षिणेकडे सरलेले आहेत.बळीराजा पाताळात म्हणजेच दक्षिणेकडे आलेला आहे.त्याच्या स्मृती आपण भारतीयांनी ओणम, बलिप्रतिपदा या सणाच्याद्वारे जतन करून ठेवलेल्या आहेत. दक्षिणेत सरकलेल्या नर नावाच्या असुरांनी सिंचन व्यवस्था निर्माण करून कटाची शेती केली. कटाची शेती म्हणजे गणाची सामुहिक शेती होय. सामूहिक शेती करणाऱ्या नर गणाच्या असूर लोकांचा समुदाय म्हणजेच नरक होय. (नर+कटाची). त्यातील अधिक प्रगत लोकांचा गण म्हणजे *वानर* गण होय. वानर हे जंगलात सरकती शेती करणारे. एका शेती मौसमात एका ठिकाणी तर दूसऱ्या मौसमात दूसऱ्या ठिकाणी शेती करत. त्यामूळे जंगलाची नासधूस होत नसे.जंगल साफ करून म्हणजेच जंगल जाळून व्यापक शेती करणारा गण म्हणजे *वैश्वानर* गण होय. वैश्वानर आर्यांच्या अंकित झाल्यामूळे समुळ जंगले जाळून नव्या वसाहती निर्माण करण्यास ते आर्यांना मदत करु लागले. याबाबची विस्तारित मांडणी प्राच्यविद्येचे अभ्यासक राजकुमार घोगरे यांनी केलेली आहे.
नरक गणातील लोक खूप ग्रेट होते.नरक गणातील असूर लोकांचा अभिमान वाटावा, इतके ते प्रगत आणि मानवतावादी होते. ते लुटारू, क्रूर, विध्वंसक नव्हते, तर शेतीत काबाडकष्ट करून जगणारे व इतरांना जगविणारे कर्तृत्ववान लोक होते. ते ऐतखाऊ नव्हते तर श्रम करून जीवन जगणारे, नवनिर्मिती करणारे लोक होते.भारतीयांनी अशा लोकांचा अभिमान बाळगला पाहिजे, इतके ते महान होते, म्हणूनच त्यांची आठवण आपण नरक चतुर्दशीच्या रूपाने जिवंत ठेवलेली आहे.आपण त्यांच्या नावाने दिवाळी साजरी करतो. दिवाळीतील प्रत्येक दिवस हा कर्तृत्ववान असूर लोकांच्या कार्यकर्तृत्वाचा जयजयकार करणारा दिवस आहे.
आम्ही लहानपणी दीपावलीच्या वेळेस सकाळी लवकर नाही उठलो,की वडील म्हणायचे “लवकर उठून आंघोळ करा,उशिरा उठलात तर नरकात जाल.” नरकात जायच्या भीतीने आम्ही सूर्योदयापूर्वीच आंघोळ करायचो. कारण नरकात वाईट लोक जातात,तेथे त्यांचा खूप छळ केला जातो, तेथे रवरव नरक असतो, अशा पुराणकथा ऐकल्या होत्या.
नरक जर खरच वाईट असता तर नरक चतुर्दशीला आपण दिवाळी साजरी केली असती का?. पण आता आम्ही म्हणतो आंघोळीला उशीर झाला तरी चालेल, कारण नरक गणातील लोक आपले पूर्वज आहेत, नरक हा पृथ्वीवरच आहे. आपण कृषिसंस्कृतीतील लोक त्यांचे वारदादार आहोत. आपल्या लोकांत म्हणजे नरकात राहायला नक्की आवडेल. अशा नरकचतुर्दशीच्या अर्थात दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा!
-डॉ.श्रीमंत कोकाटे (सुप्रसिध्द इतिहास संशोधक)