काय सांगता? डाळिंब दाणे ४०० रूपये किलो
दोन हजार टन डाळिंब दाणे पोहोचले परदेशात
थिंक टँक न्यूज नेटवर्क : डॉ. नाना हालंगडे
सांगोल्याचं डाळिंब सातासमुद्रापलीकडं पोहचलं. पण यंदा मात्र तेल्या आणि मर रोगाने बागा उदध्वस्त झाल्या. अशातच मृग बहरातील डाळिंब मात्र तरले. आपल्या देशातून आत्ता डाळिंब दाणेही निर्यात होवू लागले असून, याचा ही किलोचा भाव चारशे प्रतिकिलो असा आहे. यातून बागायतदारही खुश असून, दोन हजार टन दाणे आत्ता परदेशात पोहचले आहेत. (Promoganate Farming in Maharashtra)
डाळिंब उत्पादनात अग्रेसर असलेल्या आपल्या देशातून दरवर्षी सुमारे 30 हून अधिक देशात डाळिंबाची निर्यात होते. पण आता डाळिंबाबरोबरच निव्वळ डाळिंबाच्या दाण्यांनाही (अनारदाणा) काही देशातून मागणी वाढत आहे. डाळिंब उत्पादक आणि निर्यातदारांसाठी ही संधी आहे. प्राथमिक माहितीनुसार आत्तापर्यंत सुमारे दोन हजार टन डाळिंब दाण्यांची निर्यात झाली आहे.
देशात जवळपास 2 लाख 61 हजार हेक्टर इतके डाळिंबाचे क्षेत्र आहे, यामध्ये सर्वाधिक क्षेत्र महाराष्ट्र राज्यात आहे. इराण, चीन, टर्की, स्पेन हे देश भारताबरोबर डाळिंब उत्पादनात स्पर्धा करतात. पण एकूणच डाळिंबाची चव, रंग,आकारमान या सर्व पातळ्यांवर भारताचे डाळिंब सरस आहे.
जगभरातील एकूण डाळिंब निरयातीत 22 टक्के वाटा भारताचा आहे. यंदा डाळिंबाबरोबरच निव्वळ डाळिंबाच्या दाण्याचीही दोन हजार टनापर्यंत निर्यात झाली आहे. त्याशिवाय सुमारे 67 हजार 980 टन डाळिंबाची निर्यात झाली आहे. त्यातून 516 कोटी 67 लाखाचे परकीय चलन मिळाले आहे यावरून निर्यातीतील भारताचा वाटा स्पष्ट होती.
दाण्यांना दरही दुप्पट
डाळिंबाला निर्यातीमध्ये किमान प्रती किलो 150 ते 200 रूपया पर्यंत गुणवत्ता पाहून दर मिळतो. यंदाही जवळपास पावणेदोनशे रुपयांचा पुढे दर मिळाले. पण निर्यातदारांना डाळिंबाचे दाणे सोलून ते पॅकिंग करून पुढे विक्रीसाठी नेण्यात थोडे श्रम आणि अतिरिक्त वेळ जात असला तरी तयार दाणे मिळत नसल्याने परदेशी बाजारपेठांत मात्र त्याला प्रती किलो सुमारे 400 रुपयांपर्यंत दरही दुप्पट मिळाला आहे.
दाणे निर्यातीला महत्त्व का?
अलिकडच्या काही वर्षात डाळिंबावरील तेल्या आणि इतर बुरशीजन्य रोगामुळे फळांवर डाग पडतात आणि ती फळे फ्रेश मार्केटिंग वा निर्यातीला चालत नाहीत. शिवाय निर्यातीसाठी जाणाऱ्या डाळिंबाच्या तपासणीत सरसकट डाळिंबाची तपासणी होते वास्तविक डाळिंबाच्या सालींमध्ये ऊवर्रकाचे अंश सापडतात. परंतु दाण्यांमघ्ये ते नसतात. अर्थात डाळिंब दाणे रेसिड्यू फ्री असतात. आत्ता थेट डाळिंबाच्या दाण्यांची निर्यात होणार असल्याने, डाळिंब उत्पादक आणि निर्यातदारांना चांगली संधी आहे.
डाळिंब संशोधन केंद्र नावालाच
सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक डाळिंब क्षेत्र सांगोला तालुक्यात आहे,पण दरवेळी ऐन हंगामात या बागा रोगाने बळी पडत आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पुरता हैराण झाला आहे. यासाठी सोलापूर येथे डाळिंब संशोधन केंद्र आहे. पण,याचा काहीच फायदा डाळिंब बागायतदारांना होत नाही. त्यामुळे हे संशोधन केंद्र काय कामाचे? असा सवाल शेतकरी वर्ग करीत आहे. याच संशोधन केंद्रातून शेतकऱ्यांना योग्य सल्ले मिळाले तर हे डाळिंब अजूनही भरारी घेईल. यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.