
सांगोला : डॉ. बाळासाहेब मागाडे
संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी शेकापने अधिकृत उमेदवार म्हणून भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे “बाबासाहेब की अनिकेत?” या वादावर अखेर पडदा पडला आहे. उमेदवारीची घोषणा होताच डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मात्र दुसरीकडे डॉ. अनिकेत देशमुख यांच्या कार्यकर्त्यांत मात्र नाराजी पसरली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एकनिष्ठता, तत्वनिष्ठा जोपासून सर्वाधिकवेळा आमदार बनून विक्रम स्थापित केलेले आ.भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेतकरी कामगार पक्षाची मोठी हानी झाली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी “प्रती आबासाहेब” बनून कामाचा धडाका सुरू केला. त्यांचे चाहते हे “बाबासाहेब, तुम्हीच आहात आमचे आबासाहेब” हे घोषवाक्य समाजमनात रुजवताना दिसत होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी द्यावी अशी हजारो कार्यकर्त्यांची मागणी होती.
दुसरीकडे भाई गणपतराव देशमुख यांचे नातू तथा मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अल्प मताने पराभूत झालेले डॉ. अनिकेत देशमुख यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी द्यावी असाही सूर दिसून येत होता.
डॉ. अनिकेत देशमुख यांनी मागील काही महिन्यांपासून सांगोला तालुक्यात सक्रिय होत आपले अस्तित्त्व वाढविण्याचा प्रयत्न केला होता. “मलाच उमेदवारी मिळेल, पक्ष माझ्यावर अन्याय करणार नाही” असा विश्वास ते बोलून दाखवत होते.
कोण आहेत बाबासाहेब?
डॉ. बाबासाहेब देशमुख हे उच्च विद्या विभूषित आहेत. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च पदवी प्राप्त केली आहे. भाई गणपतराव देशमुख यांचे ते नातू तथा भाई पोपटराव देशमुख यांचे सुपूत्र आहेत. भाई गणपतराव देशमुख यांचे राहणीमान खूपच साधे असायचे. पांढरा शुभ्र साधा पोशाख व पायात चप्पल असे स्वरूप असे. गावखेड्यातून आलेल्या खेडूतासोबत ते मनमोकळेणाने संवाद साधत असत. लोकांची साध्यातली साधी अडचण ते लक्ष घालून सोडवत असत. अगदी तंतोतंत राहणीमान डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे आहे. भाई गणपतराव देशमुख यांच्या देहबोली प्रमाणेच डॉ. बाबासाहेब देशमुख यांची देहबोली आहे.
डॉ. बाबासाहेब देशमुख हे आबासाहेबांप्रमाणे साधा पोशाख परिधान करतात. भाषाशैलीही आबासाहेबांप्रमाणे मृदू आणि अपील करणारी आहे. आबासाहेब हे लोकांत मिसळून, जमिनीवर बसून संवाद साधत असत. अगदी त्यांच्यासारखी शैली डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी अवलंबली आहे.
कै.आबासाहेबांचे जणू प्रतिरूपच
भाई गणपतराव देशमुख तथा आबासाहेब हे संयमी आणि रुजू व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या तोंडून अपशब्द कधीही निघत नसत. एखाद्याने टीका केली तरी त्या टीकेबाबत ते विचार करून उत्तर देत असत. त्यांची विधिमंडळातील भाषणे अभ्यासपूर्ण असत. आबासाहेबांप्रमाणे बोलण्याची, चालण्याची व एकूण देहबोलीची शैली डॉ. बाबासाहेब देशमुख यांची आहे.
भेटायला येणाऱ्या प्रत्येकाची ते आपुलकीने विचारपूस करतात. त्यांची अडचण नीटपणे समजून घेतात. वस्तुस्थिती पाहून ते पुढील कार्यवाही करतात. त्यांच्या या स्वभावामुळे ते कार्यकर्त्यांना प्रती आबासाहेब वाटतात.
जनसंपर्काचे जाळे
कोरोना काळात डॉ. बाबासाहेबांनी अनेकांना फोन करून, धीर दिला, मदत केली. त्यावेळी बाबासाहेब कलकत्त्यात होते, तरीही आबासाहेब असताना बाबासाहेब तालुकावासियांची काळजी करीत होते. भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर पक्षाची ताकद वाढविण्याचे काम बाबासाहेब देशमुख यांनी केले.
आ. शहाजीबापू पाटलांसोबत होणार सामना
भाई गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या रूपाने शेकापचा थेट सामना आ. शहाजीबापू पाटलांसोबत होणार आहे.