सांगोलेकरांनी शेकाप आणि काँग्रेस सोडून दुसरा पक्ष स्वीकारला नाही
जुन्या आठवणी सांगताना शरद पवारांनी नेतेमंडळींना सुनावलं
थिंक टँक न्यूज नेटवर्क : नाना हालंगडे
महाराष्ट्रात सांगोला हा एकमेव तालुका आहे की इथल्या मतदारांनी शेकाप आणि काँग्रेस सोडून दुसरा पक्ष स्वीकारला नाही. भाई गणपतराव देशमुख यांनी इथल्या लोकांना एक दिशा दिली आहे. ठरलेली वाट सोडून इथली माणसं दुसऱ्या वाटेला सहसा जात नाहीत. गणपतराव देशमुख यांची तिसरी पिढी राजकारणात काही चांगले करू पाहत आहे. त्यांच्या पाठीशी लोकांनी खंबीरपणे उभे राहायला हवे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगोला येथील कार्यक्रमात केले.
सांगोला येथे भाई गणपतराव देशमुख यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमानिमित्ताने खा. शरद पवार बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शेकापचे आ. जयंत पाटील, राष्ट्रवादीचे आ. जयंत पाटील, मा. खा. रणजितसिंह मोहिते पाटील, खा. संजयकाका पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, आ. शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील आदी नेतेमंडळी उपस्थित होती. मान्यवरांच्या हस्ते पुतळा अनावरण आणि महाविद्यालयाचा नामकरण सोहळा पार पडला.
खा. शरद पवार पुढे म्हणाले की, भाई गणपतराव देशमुख हे १९६२ साली विधानसभेत पहिल्यांदा निवडून आले. मी १९६७ साली विधानसभेत निवडून आलो. भाई गणपतराव देशमुख यांची काम करण्याची पद्धत खूप वेगळी होती. दुष्काळी सांगोला तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर यांच्या हिताचा ते सतत विचार करत असत. तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्र्याला सांगोला येथे घेऊन येण्याची विनंती त्यांनी माझ्याकडे केली. मी त्यावेळी केंद्रीय कृषी मंत्र्याना घेऊन आलो. वाटंबरे येथे केंद्रीय मंत्र्यांनी पाहणी केली. इथल्या दुष्काळी पट्ट्यात डाळिंबाच्या बागा लागवड करण्यासाठी अर्थसाह्य करण्याची विनंती केली. तेव्हा डाळिंब बागायतीसाठी अर्थ सहाय्य देण्याचा महत्त्वाचा निर्णय भाई गणपतराव देशमुख यांच्यामुळे सरकारने घेतला.
तो काळ शेकापच्या विचारांनी भारावलेला होता. माझी आई, भाऊ घरातील सर्वच लोक शेकाप विचारधारा मानणारे होते. भाई गणपतराव देशमुख यांच्या विचारांत स्पष्टता होती. भाई गणपतराव देशमुख सूतगिरणी सुरु करुन देशाला दिशा दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाई गणपतराव देशमुख यांच्या सोबत अनेक वर्षे काम करण्याची संधी मला मिळाली. भाई गणपतराव देशमुख यांची विधिमंडळातील भाषणे अभ्यासपूर्ण असत. प्रशासकीय कामासाठी त्यांच्याकडून अनेक नेते सल्ले घेत असत. त्यांचा अभ्यास मोठा होता. भाई गणपतराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा विधिमंडळाच्या परिसरात बसविण्याची मागणी होत आहे. आम्ही या मागणीचा निश्चित विचार करू.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांचे सरकार बरखास्त झाल्यानंतर तत्कालीन मंत्री गणपतराव देशमुख हे गाडी, बंगला सोडून एसटी बसने सांगोल्याला आले होते. विरोधी पक्षात राहून काम करण्याची शिकवण आम्हाला त्यांच्याकडून शिकता आली. त्यांचा एकलव्य म्हणून त्यांच्याकडून आम्हाला बरंच काही शिकता आलं. आम्ही विदर्भाच्या प्रश्नावर बोलायचो. गणपतराव देशमुख बोलायला उठायचे, तेव्हा ते म्हणायचे, तुम्ही विदर्भाचे प्रश्न मांडता. पण, तुमचं आाणि आमचं दुखणं सारखंच आहे. एकदा राज्याच्या दुष्काळी भागात फिरा म्हणजे हे दुखणं काय आहे, ते तुम्हाला कळेल,’ असे सांगायाचे.
पुरोगामी विचारासाठी ते शेवटपर्यंत ठाम राहिले. वंचितांसाठी लढण्याचा त्यांचा बाणा कायम प्रेरणा देणारा होता.
यावेळी आम.बबनदादा शिंदे, आम.अनिल बाबर, आम. समाधान आवताडे, आम.सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार पंडितशेठ पाटील, पाणी संघर्ष चळवळीचे नेते वैभवकाका नायकवडी, पाणी संघर्ष चळवळीचे नेते शिवाजीराव काळुंगे, पाणी संघर्ष चळवळीचे नेते बाबुराव गुरव, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आदी नेते उपस्थित होते.
हेही वाचा
59 वर्षे एकच झेंडा आणि पक्ष : निष्ठेचं दुसरं नाव ‘भाई गणपतराव देशमुख’