
सांगोला : डॉ. बाळासाहेब मागाडे
दिलदार मनाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भर सभेत भाषण करताना स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली. पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. डॉ. बाबासाहेब देशमुख, दीपकआबा साळुंखे-पाटील, भाजपचे चेतनसिंह केदार, श्रीकांत देशमुख यांच्या साक्षीने हा प्रकार घडला. बापूंवर ही वेळ का आली? बापूंच्या मनात कोणत्या चुकीची हुरहूर लागली आहे? पराभव बापूंच्या जिव्हारी लागला आहे का? असे असंख्य प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होताना दिसत आहेत.
त्याचं झालं असं. सांगोला येथे शेकापचे कट्टर समर्थक तथा उद्योगपती बाळासाहेब एरंडे यांच्या पुढाकारातून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या जंगी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास सर्वच पक्षांची नेतेमंडळी उपस्थित होती. विरोधक मंडळी एकाच स्टेजवर एकत्र आल्यानं राजकीय भाष्य, एकमेकांची ऊनीदुणी, शालजोडे हे होणारच होतं. आणि झालंही.
बापू भाषणाला उभे राहिले.. टाळ्यांचा कडकडाट झाला…
“मागील वर्षी झालेल्या लोकसभा “निवडणुकीमध्ये पाणी देणाऱ्या खासदाराला आमच्या जनतेने निवडून दिले नाही. पाणी आडवणाऱ्या व्यक्तीला खासदार म्हणून पाठवले. ही जनतेची माणूस म्हणून चूक झाली आहे” असं म्हणत माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भर सभेत स्वतःला थोबाडीत मारून घेतली.
यावेळी माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते. यावेळी शहाजी बापू पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली
सांगोला मतदारसंघ हा माढा लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघात रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाल्याचे शल्य आजही माजी आमदार शहाजी पाटील यांच्या मनात असल्याचे दिसते. याच बाबत पाणी प्रश्नावर शहाजी बापूंनी स्वतःला थोबाडीत मारून घेतली.
“सांगोला मतदारसंघाला आजपर्यंत कुणी दिला नाही इतका सर्वाधिक निधी शिवसेनेचा आमदार असतानाही मला देवेंद्र फडणवीस यांनी दिला. त्यामुळे आपण भाजपचे उपकार कधी विसरणार नाही. आपले संपूर्ण आयुष्य भाजपसाठी तळमळ करत राहील”, असे विधान माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले.
बापू म्हणाले की, “सांगोला तालुक्यातील येणाऱ्या उजनीतील पाणी प्रश्नाबाबत आपण यापूर्वीही बोललो आहे. पाणी कुणी अडवलं? कोणी घेतलं? हे जाहीर सांगितल आहे. आता मात्र मी जाहीर सांगणार नाही. कारण त्यांच्याकडे अर्थ खातं आहे. माझी अडचण कोणी करू नका” असे म्हणत माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी अजित पवारांचे नाव न घेता. उजनीचे पाणी बारामतीला जात असल्याचा अप्रत्यक्ष उल्लेख केला.
बापू म्हणाले की,
“माझं डॉ बाबासाहेब देशमुख यांना सांगणं आहे. डॉ. अनिकेत देशमुख तुम्हीही नीट ऐका. आमदार कुठे आहेत. डॉ. बाबासाहेब तुम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात अजिबात येऊ नका आणि तुम्ही आले तरी आम्ही तुम्हाला घेतबी नाही. पण, तुम्ही या महिन्यात निर्णय घ्या आणि शेतकरी कामगार पक्ष हा शिवसेना-भाजपचा मित्रपक्ष झाला आहे, एवढी बातमी आम्हाला द्या. दंडवत घालत चिकमहूदहून (ता. सांगोला) तुमच्या घरी येतो. अगोदर बाईंचं दर्शन घेतो आणि तुम्ही लहान असला तरी तुमचं दर्शन घेतो”, अशी थेट ऑफर माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना दिली.
“मधल्या काळात आपल्याला पाणी का दिलं नाही. कोण नव्हतं या ठिकाणी. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, बाळासाहेब देसाई, पंतगराव कदम अशी डोंगराएवढी माणसं या भागात होऊन गेली. पण, आपल्या दुष्काळाला भाजप आणि शिवसेना युतीने लावला, हे मी जाहीरपणे सांगतो. त्यामुळे कोणत्या राजकीय वाटा धरायच्या हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आरडून ओरडून प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी सत्ता लागते, हे यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या महान माणसाने सांगितले आहे.”
“लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी पाण्यासाठी जीवनभर लढा दिला. दऱ्याखोऱ्यातून फिरले पण काँग्रेसने कधीही त्यांच्या मागणीला साथ दिली नाही, पण शिवेसेनेतून खासदार झाले आणि राज्यात १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले, त्यावेळीच टेंभू, म्हैसाळ, उजनीचे पाणी भाजप शिवसेना सरकारच्या काळात सांगोला तालुक्यासाठी मंजूर झाले आहे.”
“एकट्या डॉ. बाबासाहेब देशमुखांना काय निवडून देताय. एकाच पंचवार्षिकला मला, डॉ. बाबासाहेब देशमुख, दीपकआबा साळुंखे आणि डॉ अनिकेत देशमुखांना निवडून दिलं, तरी तुमचं कल्याण होणार नाही. कारण घोडं कुठं पेंड खातंय हे मला माहिती आहे. काँग्रेस काय आपली शत्रू होती काय. माझं, जयाभाऊ आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं आयुष्य काँग्रेस पक्षातच गेलं आहे.”
“सर्वांत महत्वाचा मुद्दा सांगण्यासाठी उभा आहे. माझ्या मनाला एक गोष्ट चाटून गेली आहे. ज्या माणसाने सांगोल्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी गेली पाच वर्षे चांगल्या पद्धतीने काम केले, त्या खासदाराला तुम्ही बेस्टपैकी पाडून टाळ्या वाजवल्या. पाप मीबी केलंय. चांगलं कोण वागलं आणि पाप कोणी केली, हे ज्याच्या त्याला माहिती आहे. ज्याच्या त्याने आपापल्या आत्म्याला विचारायचे.”