समाजाने बळ दिले तरच चळवळ टिकेल : सुनील वाघमारे
सांगोल्यात मागाडे बंधूंचा सत्कार उत्साहात

सांगोला : प्रतिनिधी
सध्या समतावादी लोक हे विषमतावादी व्यवस्थेच्या वळचणीला जाऊन बसले आहेत. बुद्धिजीवी लोकांनी सामाजिक चळवळ चालवायला पाहिजे होती. मात्र तसे न होता पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडणारे लोक ही चळवळ हाकत असल्याने ते या विषमतावादी व्यवस्थेला विकले जात आहेत. जर समाज घटकांनी त्यांना आधार दिला तरच ही चळवळ मजबूत होणार आहे, असे प्रतिपादन फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच अध्यक्ष सुनील वाघमारे यांनी केले.
सांगोला येथे जयकर मागाडे (मुंबई) यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि साहित्यिक जगदीश मागाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बोलत होते.
पुढे ते म्हणाले, जयकर मागाडे आणि जगदीश मागाडे या बंधूंचे आपल्या संसारिक सुखाचा त्याग करून सामाजिक कार्य चालू आहे. त्या प्रमाणे सध्यच्या विषमतावादी नागाला ठेवण्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन त्याला फक्त जखमी करणे गरजेचे आहे, म्हणजे जखमी विषमतावादी नागाला समाजरूपी मुंग्या नष्ट करतील असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केलं. समाज भूषण पुरस्कर्ते जयकर मागाडे आणि जगदीश मागाडे या बंधूंना पुढील सामाजिक कार्यास व जीवनास शुभेच्छा दिल्या.
यावेळी सांगली जिल्हा आरपीआय जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, जेष्ठ साहित्यिक बा.ना धांडोरे, माजी उपसभापती तानाजी चंदनशिवे, बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे, भटके विमुक्त जाती जमाती संघटना राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिंद्र भोसले, भटके विमुक्त जाती जमाती महाराष्ट्र राज्य संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष लक्ष्मण घनसरवाड, अस्तित्व सामाजिक संघटना अध्यक्ष शहाजी गडहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे यांनी या दोन्ही मागाडे बंधूना शुभेच्छा देताना, सध्याच्या सरकारवर टिका करत EVM चा विरोध दर्शविला. सध्या भारत देशात विघातक शक्ती डोके वर काढत असून हे लोकशाहीला घातक आहे असे म्हणाले. तसेच परभणी येथील घटनेचा निषेध व्यक्त करत सामाजिक चळवळीतील समविचारी लोकांनी या सर्व समाज विघातक शक्ती विरोधात एकत्र येणे गरजेचे असल्याचे ही ते यावेळी म्हणाले.
यावेळी बाळासाहेब बनसोडे, शहाजी गडहिरे, मच्छिंद्र भोसले, तानाजी चंदनशिवे आदींनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
त्याचबरोबर पुरस्कर्ते जयकर मागाडे यांनी आपण या पुरस्कारासाठी कुठेही वशिला लावला नाही. केवळ आतापर्यंत आपण प्रामाणिकपणे केलेल्या सामाजिक कार्यामुळे महाराष्ट्र शासनाने आपल्याला हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. यामुळे मला आतापर्यंत आपण केलेल्या कामाची पोहच पावती मिळाल्याचे आनंद आहे. तसेच पुढेही असे कार्य करण्याची ऊर्जा मिळाली असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाची सुरुवात ही आदर्शांच्या मुर्ती पुजनाने केली. गाथा पठन हे धम्म मित्र नवनाथ मोरे यांनी केले. यावेळी एल.एस सोनकांबळे, राजाराम मागाडे, संजय वाघमारे, साबळे गुरूजी, प्रभाकर कसबे, अरूण कसबे, मोटे गुरूजी, संभाजी मागाडे, नितीन वाघमारे, झुंजार मागाडे, नितीन कसबे, पोलीस अधिकारी विश्वनाथ सिद, संजय माने, श्रीकांत कसबे, आदी मान्यवर व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
शेवटी धम्मचारी ज्ञानसेन यांनी धम्मदेसना देऊन आशिर्वाद गाथा घेतली आणि यानंतर सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.