ताजे अपडेट
Trending

वागळे की दुनिया!

विजय चोरमारे यांचा खास लेख

Spread the love

निखिल वागळे यांची मते अनेकदा मलाही पटत नाहीत आणि माझ्याप्रमाणे अनेकांना पटत नाहीत. तरीसुद्धा एखाद्या विषयाबाबत वागळे यांचे मत काय आहे याचे सार्वत्रिक कुतूहल असते. आणि आपल्या चाहत्यांना तसेच वैचारिक विरोधकांनाही ते कधी निराश करीत नाहीत. अनेकदा त्यांच्या पोस्टनंतर वाटते, त्यांनी हे लिहायला नको होते. मग मी स्वतःला समजावतो की, आपण स्वतःच्या फुटपट्ट्या वापरून त्यांचे मूल्यमापन करतोय, हे योग्य नाही. ते तसे आहेत म्हणूनच निखिल वागळे आहेत. बाकीच्यांच्यात आणि त्यांच्यात हाच तर फरक आहे.

कोल्हापुरात १८ वर्षांपूर्वी पत्रकार संघटनेच्या एका समारंभात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे प्रमुख पाहुणे होते. त्यांची ओळख करून देण्याची जबाबदारी माझ्यावर होती. तेव्हा मी म्हणालो होतो, की वृत्तपत्राच्या आठ कॉलमात न मावणारी ही वागळे की दुनिया आहे !

मुंबईत राहून बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला अंगावर घेणारे निखिल वागळे माझ्यासारख्या कोल्हापुरात बातमीदारी करणाऱ्यासाठी हिरो होते. नव्वदच्या दशकात अधेमधे कधी निमित्तांनी मुंबईला आलो तर महानगरचे आठवडाभरचे अंक घेऊन परत जात होतो. मी तेव्हा कुठल्याही विषयात काहीही भूमिका न घेणा-या सकाळसारख्या वृत्तपत्रात होतो. बातमी कधीही एकांगी असता कामा नये, कुणावर टीका असेल तर दुसरी बाजू असायलाच हवी, असे संस्कार असलेली सकाळची पत्रकारिता एकीकडे आणि महानगरची एकांगी वाटावी अशी आक्रमक पत्रकारिता दुसरीकडे. परंतु बातम्यांच्या पलीकडे महानगरचे अग्रलेख आणि नामवंत लेखकांचे स्तंभ केवळ वाचनीयच नव्हे, तर संग्रही ठेवण्याजोगे असत. कॉलेजला असल्यापासून षटकार, चंदेरीचा नियमित वाचक होतोच. नंतरच्या काळात अक्षर दिवाळी अंकाचाही चाहता बनलो. मुंबई आणि कोल्हापूर या दोन शहरांमधले अंतर खूप होते. आम्हा दोघांच्या आकलन आणि प्रभावामध्येही खूप अंतर होते. म्हणजे ते एका उंचीवर होते आणि आपण तुलनेने कुठेच नाही याची जाणीव होती. वयामधले अंतर होतेच. २००८ मध्ये लोकमतला असताना कोल्हापूरहून मुंबईत आलो, त्याच सुमारास आयबीएन लोकमत वाहिनी सुरू झाली. सुरुवातीचे काही महिने लोकमतमध्ये काढल्यानंतर मी प्रहारमध्ये जॉईन झालो. वागळेंशी संपर्काला कारणीभूत ठरला तो माझा कोल्हापूरचा मित्र चंद्रकांत पाटील. तो आयबीएनमध्ये इनपुट हेड होता. साहित्य विषयक चर्चेसाठी त्याने एकदा फोन केला आणि मी चर्चेत सहभागी झालो. असे दोन-तीन कार्यक्रम त्यांच्यासोबत केले असतील. त्यातून आमची नीट ओळख वगैरेही झाली नाही. दरम्यान वागळे आयबीएन लोकमत सोडून महाराष्ट्र वन चॅनलला जॉईन झाले.

२०१५ मध्ये छगन भुजबळ यांच्यासंदर्भातील वाद सुरू झाला होता. त्यावर  मी एक ट्विट केले होते. ते ट्विट वाचून त्या रात्रीच्या चर्चेसाठी त्यांनी मला निमंत्रित केले. त्याआधी कोल्हापूरला असताना २०१४च्या लोकसभा निवडणूक काळात उदय निरगुडकर यांनी झी २४ ताससाठी करार केला. संपूर्ण निवडणूक काळात पश्चिम महाराष्ट्रासंदर्भातील चर्चेत मी सहभागी होत असे. परंतु ते प्रादेशिक मर्यादेतच होते. भुजबळ यांच्यावरील ट्विटनंतर वागळे यांच्यासोबत आजचा सवालमध्ये सहभागी झाल्यानंतर ख-या अर्थाने वृत्त वाहिन्यांवरील विश्लेषक म्हणून नवी इनिंग सुरू झाली. चार-दोन दिवसांतच ऑगस्टा वेस्टलँडसंदर्भातील चर्चा होती. त्यासाठी फोन आल्यावर तेथील समन्वयकाला सांगितले की, हा माझा विषय नाही, यायचे असेल तर मला तयारी करून यावे लागेल. त्यावर दहा मिनिटात, वागळे सर म्हणालेत तयारी करून या, असा उलटा निरोप आला. ही गोष्टही माझ्यासाठी महत्त्वाची होती आणि विश्लेषक म्हणून भूमिका तयार करणारी होती. विषय कोणताही असला तरी तयारी करूनच जावे लागते, परंतु एखादा आपल्या अभ्यासाचा किंवा आस्थेचा विषय नसला तरी तयारी करून जाण्यात काही गैर नसते, असाही संदेश त्यांच्या या निरोपामध्ये होता. ती चर्चाही उत्तम झाली.

महाराष्ट्र वनमधील चर्चेमध्ये वागळे यांच्या शो मध्ये नियमित सहभागी होत होतो, त्यांच्यानंतर तिथे आलेल्या आशिष जाधव यांच्या काळातही तेच सातत्य कायम राहिले. पुढे वागळे टीव्ही नाईनला गेल्यानंतर तिथेही त्यांच्या शो मध्ये अधुनमधून जाणे व्हायचे. त्यांच्यामुळे सुरू झालेला हा वृत्तवाहिन्यांवरील चर्चेचा सिलसिला कुठल्या एका वाहिनीपुरता मर्यादित राहिला नाही. त्यामुळे राजकीय, सामाजिक प्रश्नांबाबत सतत अपडेट राहणे ओघाने आले. प्रश्नांचे विविध अंगांनी आकलन करून घेणेही आले. आता मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये संपादक असलेली मित्रमंडळी समवयस्क आहेत, त्यामुळे एक प्रकारचा मोकळेपणा असतो. अशा कोणत्याही चर्चेत भाग घेणे आनंददायक असतेच. परंतु तरीसुद्धा सतत जाणवत राहते की, निखिल वागळे यांच्यासमोर चर्चेला बसण्यात आणि अन्य कुणाहीपुढे चर्चेला बसण्यात खूप फरक असतो. त्यांच्यासमोर बसल्यानंतर स्वतः अपग्रेड झाल्याचा फील यायचा. त्यांची भूमिका ठाम असली तरी स्वतः कमी बोलून सहभागी लोकांना जास्तीत जास्त संधी देण्याचे आणि चर्चा रंगतदार बनवण्याचे त्यांच्या इतके कौशल्य अन्य कुणाकडे अभावानेच आढळले. त्यांच्या भूमिकेहून वेगळी लाईन मांडली तर त्यांच्या उलट-सुलट प्रश्नांना उत्तरे देण्याचा दबाव असायचा. परंतु वेगळ्या भूमिकेबाबतही त्यांनी अनेकदा स्वागतशीलता दाखवली. ते सर्वच बाबतीत ज्येष्ठ असले तरी केवळ वैचारिक भूमिकेमुळे आमचे संबंध मित्रत्वाच्या पातळीवर आले.

निखिल वागळे यांची मते अनेकदा मलाही पटत नाहीत आणि माझ्याप्रमाणे अनेकांना पटत नाहीत. तरीसुद्धा एखाद्या विषयाबाबत वागळे यांचे मत काय आहे याचे सार्वत्रिक कुतूहल असते. आणि आपल्या चाहत्यांना तसेच वैचारिक विरोधकांनाही ते कधी निराश करीत नाहीत. अनेकदा त्यांच्या पोस्टनंतर वाटते, त्यांनी हे लिहायला नको होते. मग मी स्वतःला समजावतो की, आपण स्वतःच्या फुटपट्ट्या वापरून त्यांचे मूल्यमापन करतोय, हे योग्य नाही. ते तसे आहेत म्हणूनच निखिल वागळे आहेत. बाकीच्यांच्यात आणि त्यांच्यात हाच तर फरक आहे. आपल्या मनातील प्रश्नाचे उत्तर सापडेपर्यंत ते कुठल्याही गोष्टीचा पिच्छा सोडत नाहीत, हे त्यांच्या टीव्हीवरच्या काळातही अनेकदा अनुभवायला आले आहे. मला नेहमी वाटते की, देशपातळीवर वृत्तवाहिन्यांचा पुरता बँड वाजला असताना मराठी वृत्तवाहिन्या तुलनेने काही तारतम्य टिकवून आहेत, याचे श्रेय वागळे यांना जाते. आयबीएन लोकमतच्या माध्यमातून त्यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमात गंभीर कंटेंट दिला. वृत्तवाहिन्या म्हणजे उथळपणा असे समीकरण बनले असताना मराठीत प्रारंभीच्या काळात वागळे यांच्यासारखा गंभीर प्रवृत्तीचा संपादक होता. शिवाय मुद्रित माध्यमांचा पुरेसा अनुभव गाठीशी असलेले राजीव खांडेकर स्टार माझामध्ये होते. त्यामुळे मराठी वृत्तवाहिन्या वाहवत गेल्या नाहीत. प्रारंभीच्या काळात जर चुकीची माणसे असती तर या जगात भलतेच काही घडताना दिसले असते. निखिल वागळे म्हणजे सतत किरकिर करणारे व्यक्तिमत्त्व असे अनेकांना वाटते. परंतु त्यांनी ग्रेट भेटच्या माध्यमातून घेतलेल्या मुलाखती पाहिल्या तर त्यांच्या सांस्कृतिक आकलनाचे आणि रसिकतेचे प्रत्यंतर येते. दरवर्षी न चुकता ते आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांना हजेरी लावत असतात. जगभरातील सिनेमाचा आस्वाद घेत असतात. मुंबईतल्या महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा हजेरी लावत  असतात. किती संपादक, पत्रकार या गोष्टी करतात?

वागळे यांनी प्रवाहाच्या बाहेर राहूनही इतका प्रभाव राखला आहे तर प्रवाहात राहून काय केले असते याची कल्पना करता येऊ शकते. दहा वर्षांपूर्वीइतके स्वातंत्र्य आजच्या काळात पत्रकारांना असते आणि वागळे मध्यवर्ती प्रवाहात (म्हणजे कॉर्पोरेट मीडियात) सक्रिय असते तर त्यांनी सत्ताधाऱ्यांना झोप लागू दिली नसती, एवढे मात्र खरे.

वृत्तवाहिन्यांवरील चर्चेच्या निमित्ताने त्यांच्याशी संपर्क होताच. परंतु नंतरही तो कायम टिकून राहिला. एखादा लेख वाचल्यानंतर ते आवर्जून फोन करून प्रतिक्रिया देतात. ट्विटरच्या माध्यमातून भूमिकेचा पाठपुरावा करतात. (माझे एखादे ट्विट त्यांनी रिट्विट केले, की त्यांच्यावर प्रेम करणारे जे सगळे ट्रोल्स आहेत, त्यांच्या प्रेमाचा वाटेकरी होण्याचे भाग्य मलाही लाभते.)  लॉकडाऊनच्या काळात त्यांनीच सुचवले की, मधल्या काळात लिहिलेल्या लेखांचे पुस्तक आले पाहिजे. तोपर्यंत माझ्या तसे काही डोक्यातही नव्हते. तीन-चार वेळा फोन करून त्यांनी पुस्तकाचा पाठपुरावा केला. प्रकाशक मिळत नसेल तर सांगा, ती व्यवस्था मी करतो असेही म्हणाले. त्यांच्याच आग्रहामुळे `संभ्रमित काळाच्या नोंदी` हे पुस्तक होऊ शकले. ग्रंथालीने ते प्रकाशित केले आणि प्रकाशन समारंभालाही पाहुणे म्हणून ते आवर्जून उपस्थित राहिले.

सगळेच व्यवस्थाशरण होत असताना त्यांच्यारुपाने कुणीतरी ठामपणे व्यवस्थेविरुद्ध उभे राहताना दिसते. कुणाच्या टीकेचा, कौतुकाचा विचार न करता आपल्या  भूमिकेचा पाठपुरावा करीत पुढे जाताना दिसते. पंधरा वर्षांपूर्वी म्हणालो होतो, की वृत्तपत्रांच्या आठ पानात न मावणारी ही वागळे की दुनिया आहे. त्यात सुधारणा करून असे म्हणावे लागेल की, ही वागळे की दुनिया आता वृत्तपत्राच्या पानावर आणि टीव्हीच्या पडद्यावरही मावेना झालीय. सोशल मीडियाचा अवकाशही तिला कमी पडतोय. अशावेळी समविचारी लोकांना `निर्भय बनो`, अशी साद घालीत त्यांनी आपली भूमिका घेऊन लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्धार केला.
लोकशाही रक्षणाची लढाई आजही सुरू आहे.

आदरणीय निखिल वागळे सरांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

– विजय चोरमारे

टीम थिंक टँक

थिंक टँक लाईव्ह हे थिंक टँक डिजिटल मीडियाचे मराठी न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, लेख यातील मतांशी संपादक अथवा संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. लेखातील सर्व मते ही त्या लेखकाची स्वत:ची असतात. एखाद्या लेखाशी अथवा बातमीशी आपण सहमत नसाल तर आपली मते टेक्स्ट स्वरुपात कळवावीत. योग्य मतांना प्रसिद्धी दिली जाईल. : डॉ. बाळासाहेब मागाडे (संपादक) (Mob. 7972643230)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका