
सांगोला : विशेष प्रतिनिधी
सांगोला विधानसभा मतदारसंघातील आंबेडकरी, दलित, वंचित, भटक्या, मुस्लिम समाजाला जाणून-बुजून विकासापासून दूर ठेवले जात आहे. राजकारणात या समाजाला फक्त गृहीत धरले जाते. कार्यकर्त्यांना कोणत्याही महत्त्वाच्या स्थानावर संधी दिली जात नाही. निवडणुकीच्या तोंडावर या समाजासाठी फक्त आश्वासने दिली जातात. अशा मग्रूर, घमेंडी राजकीय पक्षांना आणि त्यांच्या उमेदवारांना या विधानसभा निवडणुकीत आंबेडकरी, वंचित, दलित, मुस्लिम, भटका समाज आपली जागा दाखवून देईल, असे सांगत येत्या दोन दिवसात आपली भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती बहुजन चळवळीचे नेते बापूसाहेब ठोकळे यांनी दिली.
बापूसाहेब ठोकळे म्हणाले की, आंबेडकरी, दलित, मुस्लिम, वंचित, भटका समाज हा परिस्थितीने फाटका असला तरी हा समाज प्रचंड स्वाभिमानी आहे. या समाजाची मोठी राजकीय ताकद आहे. आजपर्यंत या समाजाचा वापर अनेक राजकीय पुढाऱ्यांनी केवळ निवडणुकीच्या राजकारणासाठी केला आहे. निवडणूक संपताच या समाजाला वाऱ्यावर सोडले जाते. या समाजाचे अनेक प्रश्न उग्ररूप धारण करीत आहेत.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जाणून-बुजून विकासापासून रोखले जाते. मागासवर्गीय शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जात नाही. समाजातील होतकरू तरुणांना उद्योग धंदे चालू करण्यासाठी बँकांचे अर्थसहाय्य मिळू नये यासाठी काही नेते आडफाटा घालतात. आंबेडकरी समाजाची चारी बाजूने कोंडी करून या समाजाला विकासापासून रोखले जाते. राजकारणातही या समाजाला बेदखल करण्यात येते.
मागासवर्गीय वस्त्यांच्या विकासासाठी आलेला निधी इतर ठिकाणी वळवण्यात आल्याच्या अनेक घटना तालुक्यात घडल्या आहेत. मागासवर्गीय वस्त्या विकासापासून दूर राहाव्यात, त्यांनी हाल सोसतच जीवन जगावे प्रसंगी मरावे या भावनेतून अनेक राजकीय नेत्यांनी तालुक्यात या समाजाची नाकेबंदी केली आहे. नेत्यांची ही जातीयवादी मानसिकता समाजाने ओळखली आहे. आंबेडकरी समाजातल्या कोणत्याही तरुणाला हे राजकीय पक्ष महत्त्वाच्या पदांवर अथवा शासकीय कमिट्यांमध्ये कोणतीही संधी देत नाहीत. फक्त संधी देण्याची आश्वासनने दिली जातात. समाजा – समाजामध्ये भांडणे लावली जातात. मागील काही वर्षात हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. समाजाचा सर्वांगीण आर्थिक विकास व्हावा, हा समाज पुढे जावा असे कोणत्याही नेत्यांना वाटत नाही.
अनेक राजकीय नेत्यांनी तालुक्यात या समाजाची नाकेबंदी केली आहे. नेत्यांची ही जातीयवादी मानसिकता समाजाने ओळखली आहे.
जातीयवादी विचारधारा थोपवण्याचा प्रयत्न
अनेक नेते जातीयवादी विचारधारा आंबेडकरी समाजावर थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा डाव ओळखून आंबेडकरी समाज जागृत झाला आहे. या समाजाने आता अशा जातीवादी पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना ओळखून त्यांना येत्या निवडणुकीत जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे.
फुले, आंबेडकर, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे आणि तमाम महापुरुषांचे विचार आचरणात आणून या समाजाला विकासाकडे घेऊन जाऊ शकेल, अशा पुरोगामी विचारधारेला साथ देण्याचा अंतिम निर्णय येत्या दोन दिवसात घोषित करण्यात येणार असल्याची माहिती बापूसाहेब ठोकळे यांनी दिली आहे.
दोन दिवसात भूमिका जाहीर करणार
वंचित उपेक्षित मागासवर्गीय समाजाची ही अवस्था झाल्याने या समाजाचे नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत त्यांनी मागासवर्गीय समाजासोबत अन्याय करणाऱ्या जातीवादी पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना या निवडणुकीत धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. उपेक्षित, वंचित घटकांना योग्य न्याय देऊ शकेल अशा उमेदवारास निवडणुकीत मदत करून जातीवादी विचार रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले अमूल्य संविधान बदलण्याच्या हालचाली देशात सुरू असताना तालुक्यातील बड्या नेत्यांनी याबाबत कधीही ठोस भूमिका घेतली नाही. ही निवडणूक संपताच आरक्षणाला घाला घातला जाईल, अशी गंभीर चर्चा होत असताना त्याबाबतही नेते संधी साधून मूग गिळून गप्प आहेत. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण याबाबत या नेत्यांनी चुप्पी साधली आहे. त्यांची ही संदीग्ध भूमिका हजारो कार्यकर्त्यांना नाराज करणारी आहे. या नाराजीतून विविध समाज घटकातील अनेक तरुण पेटून उठले आहेत. एससी वर्गात उपप्रवर्ग तयार करून मागासवर्गीय समाजात भांडणे लावण्याचे कुटिलकारस्थान खेळले जात असतानाही याबाबत हे नेते एक शब्दही बोलायला तयार नाहीत.
एवढे सगळे होऊनही मागासवर्गीय आणि वंचित घटकातील काही तरुणांना हाताशी धरून हा समाज आपल्या सोबत असल्याचे अनेक नेते भासवत आहेत. पक्षप्रवेशाचा फार्स केला जात आहे. वास्तविक मागास वर्गातील जे कार्यकर्ते पक्षप्रवेश करत आहेत असे भासवले जात आहेत त्या कार्यकर्त्यांचे त्या समाजात किती अस्तित्व आहे, त्यांचे किती महत्त्व आहे हे तो समाज जाणून आहे. समाजाची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी विविध समाज घटकातील तरुणांनी एकत्र येत याबाबत भूमिका घेण्याचे निश्चित केले आहे.
फुले, आंबेडकर, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे आणि तमाम महापुरुषांचे विचार आचरणात आणून या समाजाला विकासाकडे घेऊन जाऊ शकेल, अशा पुरोगामी विचारधारेला साथ देण्याचा अंतिम निर्णय येत्या दोन दिवसात घोषित करण्यात येणार असल्याची माहिती बापूसाहेब ठोकळे यांनी दिली आहे.