राजकीय वार्तांकन तटस्थपणे व्हावे : राजा माने
'जागर पत्रकारितेचा' या माध्यम सप्ताहात प्रतिपादन
सोलापूर : राजकीय वार्तांकनाची देशात मोठी परंपरा आहे. एखाद्या बातमीमुळे सरकारही कोसळू शकते, इतकी त्यात ताकद आहे. नव्याने पत्रकारितेत येऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांनी या प्रकारच्या पत्रकारितेचे महत्त्व ओळखून तटस्थपणे राजकीय वार्तांकन करायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राजा माने यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथील सामाजिक शास्त्रे संकुलांतर्गत मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने सुरू असलेल्या ‘जागर पत्रकारितेचा’ या सप्ताहाच्या तिसऱ्या दिवसाच्या व्याख्यानात राजा माने यांनी ‘राजकीय वार्तांकन’ या विषयावर विचार मांडले.
प्रारंभी मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन परिचय करुन दिला. गुगल मिटद्वारे ऑनलाईन स्वरुपात हा कार्यक्रम झाला.
पुढे बोलताना राजा माने म्हणाले की, राजकीय वार्तांकन करीत असताना संबधित विषयाचे परिपूर्ण ज्ञान व राजकीय समज असणे गरचेचे असते. संबंधित माहितीची खातरजमा करणे, बातमीमुळे होणारे दूरगामी परिणाम याचा सारासार विचार होणे गरजेचे आहे. एकतर्फी राजकीय वार्तांकनामुळे पत्रकार व वृत्तपत्र अडचणीत येवू शकते. अशावेळी ती परिस्थिती हाताळण्याचे सामर्थ्य पत्रकारामध्ये असायला हवे.
आपणास आंतरराष्ट्रीय राजकारणाचाही अभ्यास हवा. देशाचे कृषी क्षेत्र, रिझर्व बँक, आर्थिक तसेच औद्योगिक क्षेत्राचाही अभ्यास यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो. तत्त्वापेक्षा समाजाची बांधीलकी राजकीय पत्रकारितेत महत्त्वाची ठरते.
पुढे बोलताना त्यांनी त्यांच्या पत्रकारितेच्या कालखंडातील विविध किस्से आणि अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. राजकीय वर्तन करत विश्वासार्हता सर्वाधिक महत्त्वाची असते असेही त्यांनी सांगितले .
यावेळी पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर, डॉ. अंबादास भासके, तेजस्विनी कांबळे, डॉ. बाळासाहेब मागाडे, ऋषिकेश मंडलिक या अध्यापकांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार डॉ. बाळासाहेब मागाडे यांनी मानले.