विद्यार्थीसंख्या वाढली; पण गुणवत्ता ढासळली, ‘असर’ सर्वेक्षणातून पुढे आले सत्य
थिंक टँक / नाना हालंगडे
कोरोना महामारीनंतर ‘असर’ या संस्थेनं (ASER Annual State of Education Report) केलेल्या सर्व्हेमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना महामारीमुळे देशातील सरकारी आणि खासगी शाळेतील 5 ते 16 वयोगटातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळल्याचं ‘असर’च्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या वाचन आणि लिखाणावर परिणाम झाला असून अनेकजणांना बेरीज-वजाबाकीही येत नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. हा अहवाल शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने चिंताजनक असून यावर सरकारला विचार करावा लागणार आहे. ASER Report 2022
प्रथम फाऊंडेशनच्या नेतृत्वाखालील ASER 2022 अहवालात देशभरातील पाच ते 16 वयोगटातील मुलांचं सर्वेक्षण घेण्यात आलं. सरकारी आणि खासगी शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत या अहवालातून माहिती समोर आली आहे. कोरोना काळात मोठ्या कालावधीत शाळा बंद होत्या, मात्र मुलांच्या नोंदणीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
कोरोना महामारीच्या दोन वर्षांमध्ये देशभरातील अनेक शाळा बंद होत्या.. त्यानंतर ऑनलाइन शिक्षण सुरु झालं. पण हे ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांना रुचलं नसल्याचं समोर आले आहे. देशभरातील पाच ते 16 वयोगटातील मुलांना वाचता आणि लिहिता न येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. सरकारी शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचेही या सर्व्हेतून समोर आले आहे.
तीन लाख 74 हजार 544 घरांमधून आणि सात लाख मुलांशी (3-16 वय) सर्व्हेसाठी संपर्क करण्यात आला. Private Tuition खासगी शिकवणीकडे कल वाढला – ASER Report च्या रिपोर्ट्सनुसार, ग्रामीण भागातील दोन टक्के विद्यार्थ्यांनी शाळेत नोंदणी केलेली नाही. 2018 ते 2022 या कालावधीत शाळा बंद होत्या, तरीही विद्यार्थ्यांचा शाळेतील कल वाढला आहे. ग्रामीण भारतामध्ये खासगी शिकवणीकडेही विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचं दिसून आले आहे.
6-14 वयोगटातील मुलांची शाळेतील नोंदणी 98.4 टक्के इतकी झाली आहे. 2018 मध्ये ही संख्या 97.2 टक्के इतकी होती. त्याशिवाय देशभरात शाळाबाह्य मुलींच्या संख्येत मोठी घट झाल्याचं अहवालातून दिसून आले. 2022 मध्ये प्री प्रायमरी वयोगटातील मुलांच्या संख्येत 7.1 टक्केंनी वाढ झाली आहे. असर या संस्थेनं (ASER Annual State of Education Report) चार वर्षानंतर अहवाल तयार केला आहे. 19 हजार गाव-खेडे आणि 616 जिल्ह्यात त्यांनी असर संस्थेनं सर्व्हे केला आहे.
हेही वाचा