टी.व्ही. पत्रकारितेसमोर अनेक आव्हाने, मात्र संधीही अधिक
'जय महाराष्ट्र'चे असिस्टंट एडिटर मनोज भोयर यांचे प्रतिपादन
सोलापूर : प्रतिनिधी
आधुनिक युगात टी.व्ही. पत्रकारितेसमोर अनेक आव्हाने असली तरी या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांना संधीही मुबलक असल्याचे प्रतिपादन ‘जय महाराष्ट्र’ या लोकप्रिय वृत्तवाहिनीचे असिस्टंट एडिटर मनोज भोयर यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठातील सामाजिकशास्त्रे संकुलांतर्गत मास कम्युनिकेशन विभागातर्फे पत्रकार दिनानिमित्त ‘जागर पत्रकारितेचा’ या माध्यम सप्ताहात ते बोलत होते. ‘टी.व्ही. पत्रकारितेसमोरील आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ.रविंद्र चिंचोलकर उपस्थित होते.
भोयर पुढे म्हणाले की, डिजिटल युगात डिजिटल माध्यमांमुळे तसेच सोशल मीडियामुळे मुद्रित माध्यमांचे वाचक घटले. तीच स्थिती टी.व्ही. पत्रकारितेची आहे. टी.व्ही.वरही डिजिटल माध्यमाचा परिणाम झाला. याचा परिणाम जाहिरात मिळण्यावरही झाला आहे. असे असले तरी डिजिटल किंवा सोशल मीडियामुळे अनेक फायदेही झाले आहेत. याच आधारे मोबाईल जर्नालिझमचा नवा प्रवाह पुढे आला आहे. मोठ्या कॅमेराविना फिल्डवरचे वार्ताहर आपल्या मोबाईलवरून तत्काळ व्हीडीओ शूट करू शकतात. त्यावर प्रक्रिया करू शकतात. नवे तंत्रज्ञान हे जुन्या तंत्रज्ञानाला मागे फेकत असले तरी नवे तंत्रज्ञान स्वीकारलेच पाहिजे. टी.व्ही. पत्रकारितेत अनेकजण करिअर करू इच्छितात. त्यांणी स्वतात काळानुरून बदल करून घेतले पाहिजेत. नव्या गोष्टी शिकल्या पाहिजेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी कांबळे यांनी केले. यावेळी मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ.रविंद्र चिंचोलकर यांच्यासह डॉ.अंबादास भासके, डॉ. बाळासाहेब मागाडे, ऋषिकेश मंडलिक या अध्यापाकांसह विद्यार्थी उपस्थित होते.